Saturday, December 16, 2023

मुंबई बदलतेय... भाग १

मुंबई बदलतेय.. कित्येक वर्ष  मुंबईत राहणाऱ्या सर्वसामान्य वर्गाला मुंबईचा हा बदलणारा चेहरा पाहायला मिळतोय, मुंबईत राहून आपलं स्वप्न जगणाऱ्या मुंबईकरांना त्यांच्या शहरात झपाट्याने होणारा बदल प्रकर्षाने जाणवायला लागलाय. मुंबई बदलवण्यासाठी शासन दरबारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातायत आणि महापालिका स्तरावर त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसतेय. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या  'सर्वसामान्यांच्या मुंबईचं ' आता खऱ्या अर्थाने नवं रूप पाहायला मिळतंय.

याचा प्रत्यय गेल्या काही वर्षात तर मुंबईकरांना वेळोवेळी आला असेल. या शहराचा चेहरामोहरा बदलत असून विविध योजना, सुविधा आणि लोकाभिमुख कामांतून मुंबई महानगराचा विकास साध्य करण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे.

गेल्या काही महिन्यात हि बाब प्रकर्षाने जाणवली ती, मुंबईत वाढलेल्या प्रदूषणावर शासनाने राबवलेल्या उपाययोजना, अहोरात्र होत असलेले काम, स्वच्छता मोहीम आणि सर्वसामान्यांचा विचार करून आरोग्य व्यवस्थेत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयातून.. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाला निर्देश दिले आणि आज मुंबईत त्याचे सकारात्मक पडसाद उमटले. याच्याविषयी माहिती देणारा हा लेख...

 वाढते प्रदूषण आणि शासन उपाययोजना

प्रदूषित शहरांपैकी लाहोर, दिल्ली, कुवेत आणि त्यानंतर मुंबई एक आहे.  ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईच्या वातावरणात धूळीचं वलय पसरल्याचं दिसून येत होत. काही दिवसांपूर्वी जागतिकदृष्ट्या केलेल्या IQ air च्या डेटानुसार मुंबई प्रदूषणात चौथ्या क्रमांकावर दिसत होती. ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा तडाखा आणि खालावलेला हवेचा दर्जा यामुळे आजाराचं प्रमाण वाढलेलं दिसलं.  मुंबईबरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरंही प्रदूषित झालेली दिसली.  प्रदूषणावर उपाययोजना करताना शासनाने केवळ वायू प्रदूषणाचा विचार न करता या सगळ्याशी संबंधित असलेल्या शहर स्वच्छता, शासकीय रुग्णालय स्वच्छता, कचरा प्रदूषण अशा सर्वच अनुषंगाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आणि गेल्या काही दिवसात प्रदूषणाचे चित्र बदलून सकारात्मक बदल शहरात दिसू लागला.

मुंबईतील हवेचा दर्जा का खालावतो आहे याचा आढावा घेण्यासाठी २० ऑक्टोबरला महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी आदी यंत्रणा तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या विकासकांच्या विविध संघटनांच्या संयुक्त बैठकीत अनेक बाबी समोर आल्या. यात सगळ्यात महत्त्वाचं कारण समोर आले ते मुंबईत सुरू असलेली बांधकामं. सहा हजार ठिकाणी बांधकामं सुरू असून या बांधकामावेळी नियमांचं पालन होत नाही आणि  त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूलिकण हवेत पसरतात आणि हवा प्रदूषित होते असं मुंबई महापालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले. सोबतच मुंबईतील विविध वायू प्रकल्प, रिफायनरी यातूनही वायू प्रदूषण होत आहे. या विविध कारणांवर चर्चा करून मुंबई महापालिकेकडून काही सूचना देण्यात आल्या. बांधकाम करताना घ्यावयाची खबरदारी आणि नियम महापालिकेने जाहीर केले.

वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केलीच पाहिजे, तसे न केल्यास खासगी असो किंवा शासकीय बांधकामांचे काम थांबवण्यात येईल, असा सक्त इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला. यात बांधकामांच्या ठिकाणी असणाऱ्या  सूचनांसोबतच मुंबईतील वीज, ऊर्जा, गॅसविषयक मोठ्या प्रकल्पांतून होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्याकडून कसोशीने प्रयत्न व्हावेत. शासनाने ठरवून दिलेल्या सर्व उपाययोजना त्यांनी केल्या आहेत किंवा कसे, याची फेरतपासणी करावी असे निर्देश देण्यात आले. 

या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या काळात  उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत प्रदूषणाची समस्या आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याच्या सूचना मा. मुख्यमंत्री यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मुंबईसह महानगरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका, तसेच राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी एकत्रित कार्यवाही करावी. नागरिकांना प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, असे या बैठकीत मा. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

 मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिलेले निर्देश :

एक हजार टँकरच्या माध्यमातून पाण्याची फवारणी आणि रस्ते धुलाई

 मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावीत. त्याचबरोबर साचलेली धूळ साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्र्यांनी दिले. रस्ते धुण्यासाठी टँकरची संख्या एक हजारपर्यंत वाढवावी, असे सांगतानाच मुंबईसह महानगर परिसरात ‘एमएमआरडीए’मार्फत विकास कामे सुरू आहेत, अशा बांधकाम ठिकाणांवर धूळ रोखण्यासाठी पत्रे लावतानाच ही सर्व ठिकाणे धुळमुक्त करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्र्यांनी दिले.

 मुंबईतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेनतर्फे रस्ते आणि पदपथ पाण्याने धुवून काढले गेले. तसेच बांधकामांच्या ठिकाणी  धुळीने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी स्प्रिंकलर, स्मॉग गन वापरण्याच्या सूचना केल्या गेल्या.   मुंबईतील प्रदूषणास कारणीभूत धुळीचे कण पसरु नये यासाठी रस्त्यांवर पाण्याचा मारा करण्यात येत होता.  सर्व २४ वॉर्डात ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करून ते पाण्याने धुवून काढण्याची कामे सध्या  वेगाने सुरु आहेत. सुमारे ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करून धुण्यासाठी पाण्याचे टँकर, संयंत्रे, मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत.  हे रस्ते धुण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या तसेच स्थानिक स्त्रोतांमधील पाण्याचा वापर करण्यात येत आहे.

 बांधकामांच्या ठिकाणी स्प्रिंकलर, स्मॉग गन, यांसह  बांधकामाच्या जागी पत्रे व ताडपत्री बसवणे अशा विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यासाठी महापालिकेने नियमावली जाहीर केल्यावर बिल्डरांना १५ दिवसांची मुदत दिली, खबरदारी म्हणून या उपाययोजना राबविण्यासाठी नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. मुंबई उपनगरातील मालाड भागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांना अशा नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिका, मेट्रो, एमएमआरडीए यांच्यासह रस्ते, उड्डाणपूल, खोदकाम, अशी विविध कामे सुरू असलेल्या संबंधित २७ कंत्राटदारांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनमानात व्यत्यय येऊ नये आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कमी वर्दळीच्याकालावधीत म्हणजे पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान रस्ते धुण्याची  कामे केली जात आहेत. तर काहीविभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या वेळेत ही कार्यवाही केली जात आहे. रस्ते व पदपथ धुण्याचे काम ३ ते ४ तासांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिथे वाहनांची व नागरिकांची अधिक वर्दळ असते अशा रस्ते व पदपथांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पाणी टँकरची संख्या, टँकर फेऱ्यांची संख्या आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुरवठ्याचा सर्वात जवळचा स्रोत यांचा समावेश तपशीलवार आराखड्यात करण्यात येत आहे. पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा तसेच तलाव, विहीर, कूपनलिका यामधील पाण्याचा वापर केला जात आहे.

 क्लीन-अप मार्शलची नियुक्ती

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी व प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी  विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आता मुंबई महानगर पालिका प्रदूषण नियंत्रणासाठी  क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार असून राडारोडा, कचरा फेकणारे, प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर क्लीन-अप मार्शलची गस्त असणार आहे. प्रत्येक वॉर्डात ३० प्रमाणे ७२० क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे.

 माती, डेब्रीज झाकून न्यावे

राज्यातील सर्व महापालिका, शहरांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करतानाच शहरातील सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांवर नियंत्रण करावे. वाहनांमधून रस्त्यांवरील माती, डेब्रीज वाहून नेताना ती झाकून वाहतूक करावी. तसे न करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करावी, असे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले.

 वन क्षेत्र वाढवावे

राज्यातील महानगरांमध्ये नागरी वन क्षेत्र (मियावाकी) वाढविण्यासाठी महापालिकांनी पुढाकार घ्यावा. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्प्रिंकलर्सचा वापर करा. हवेतील प्रदूषणावर उपाययोजना करताना संनियंत्रण करणे आवश्यक आहे. मुंबईमधील धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्याचे निर्देश मा.  मुख्यमंत्र्यांनी दिले. प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी केल्या. या बैठकीत आयआयटीच्या तज्ज्ञांनी प्रदूषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

 वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेतर्फे २४ प्रभागात पथके तैनात

 या प्रकल्पांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या यंत्रणांची भरारी पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात करावी. महानगरपालिकेच्या यंत्रणेनेदेखील फेरतपासणी करून रिफायनरींच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेची खात्री करावी यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेतर्फे २४ प्रभागात पथके तैनात करण्यात आली.

पथकात दोन अभियंते, एक पोलीस, एक क्लीन-अप मार्शल असेल आणि त्यांचा प्रमुख एक पालिका अधिकारी यांचा समावेश करण्यात आला. या पथकाला एक वाहनही देण्यात आले.  पथकांनी बांधकामांच्या ठिकाणी अचानक भेट देऊन थेट  चित्रीकरण करावे आणि उपाययोजनांमध्ये कमतरता आढळून आल्यास तिथेच नोटीस बजावून अशी बांधकामे रोखावीत किंवा बांधकामाचे क्षेत्र सील करण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

 डिझेलवरील अवजड वाहनांना बंदी

डिझेलवर चालणाऱ्या आणि आठ वर्षांपेक्षा जुन्या अवजड वाहनांना मुंबईत प्रवेशासाठी बंदी घालावी, असेही मुंबई महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या  नियमावलीत म्हटले स्पष्ट केले.  त्याची जबाबदारी परिवहन विभागावर सोपवण्यात आली. बांधकाम साहित्य, राडारोडा ने-आण करणारी वाहने क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणार नाहीत आणि वाहनांच्या चाकांची प्रत्येक खेपेनंतर व्यवस्थित स्वच्छता केली जात आहे, याची खातरजमा करण्यासाठी प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची सूचना पालिकेने केली.

 घनकचऱ्याची शास्त्रोक्त  विल्हेवाट

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची पातळी कमी करायची असल्यास शहरातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे. सद्य स्थितीत अस्तित्वास असलेल्या कचऱ्याचे जलदगतीने विघटन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांचे सादरीकरण केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने  करण्यात आले.

 या संदर्भात केंद्रीय नगर विकास आणि नागरी सुविधा मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यासोबत दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली.  यावेळी मुंबईतील क्षेपणभूमीवरील (डंपिंग ग्राऊंड) साठलेल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी समिती नेमून आठवडाभरात त्याचा  कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबईतील मुलुंड, कांजुरमार्ग आणि देवनार या क्षेपणभूमीवरील हजारो टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलदगतीने विल्हेवाट लावली जावी, क्षेपणभूमीवरील कचऱ्याचे ढीग हटवावेत, असे मा. मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षात या घनकचऱ्यापासून खत निर्मिती, वीज निर्मिती करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. कांजुरमार्ग येथील वीज निर्मिती प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्प राबविण्यात यावा, असे मा. मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुंबईत उपलब्ध असणाऱ्या खारभुमीचा देखील पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेवुन सार्वजनिक कामाकरीता वापर करता येईल याबाबीकडे मा. मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

 


Tuesday, November 28, 2023

नुकताच चंद्रपूर महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा झाला. त्यानिमित्ताने चंद्रपूर शहराच्या विकासावर टाकलेला प्रकाशझोत

वाहतुकीतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पेट्रोल-डिझेलवरील वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा, यासाठी चंद्रपूर महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदीसाठी सोयीचे व्हावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका मुख्यालय शेजारील पार्किंगमध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने माझी वसुंधरा अभियान २.० व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत गुरुवार, दिनांक १६ डिसेंबर रोजी आयोजित इलेक्ट्रिक वाहने व सौर उपकरण प्रदर्शनाला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इलेक्ट्रिक वाहने शून्य उत्सर्जनामुळे पर्यावरण संवर्धनासाठी फायदेशीर आहेत. कमी दुरुस्ती खर्च, चालवण्यास सुलभ, घरी चार्जिंग करणे सोयीचे, कमी खर्चात चार्जिंग, ध्वनी प्रदूषणविरहित आहे. सौरऊर्जा हा ऊर्जेचा नैसर्गिक आणि प्रदूषणरहित स्रोत समजला जातो. त्यामुळे चंद्रपूर मनपा सौर ऊर्जेच्या वापरावर भर देत आहे.

घराच्या छतावर पडणारे पाणी रस्त्यांवरून वाहू लागते. नाले भरून वाहू लागतात. वाहुन जाणारे हे पाणी जर रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून जमिनीत साठविले गेले तर पाण्याचे दुर्भिक्ष्य नक्कीच कमी होईल, यासाठी राखीताई आग्रही आहेत. रेनवॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकातर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना मालमत्ता करात २ टक्के सूट व रु. २५००/-  अनुदान देण्याची योजना त्यांनी जाहीर केली. यासह अनेक महत्वपूर्ण योजना त्यांनी सुरु केल्या. मनपा हद्दीत ८७ हजार मालमत्ता आहेत. यातील अधिकाधिक इमारतींमधे ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. मनपाच्या सर्व ५ इमारती, २९ शाळा, ६ सार्वजनिक आरोग्य केंद्रे, १२ सार्वजनिक शौचालये अशा एकूण ५२ इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे.

चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची यात्रा दरवर्षी होत असते. आंध्रप्रदेश, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील भाविकवर्ग मोठ्या प्रमाणात चंद्रपुरात दाखल होतात. आरोग्य, स्वच्छता, वैद्यकीय सेवा आणि पाणीपुरवठ्यासह निवासाची व्यवस्था केली जाते. दुकानदारांना जागावाटप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने यात्रा परिसरात यात्रा कार्यालयाची स्थापना करण्यात आली. या कार्यालयाचे उद्घाटन महापौर राखी यांच्या हस्ते झाले. येथे येणारे भाविक झरपट नदीत पवित्र स्नान करतात. त्यासाठी गौतमनगर येथील बैल बाजारपासून झरपट नदी पात्रातील इकॉर्निया अड़विण्याकरीता ताटव्याचे बांध तयार करण्यात आले.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Wednesday, November 22, 2023

पिंपरी चिंचवड शहराच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘सहाव्या ग्वांगझू इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर अर्बन इनोव्हेशन’मध्ये (ग्वांगझू अवॉर्ड) ५४ देशातील १९३ शहरांचा समावेश होता. त्याची अंतिम फेरी सुरू असून, त्यात १५ शहरांची निवड झाली आहे. त्यामध्ये देशातील एकमेव पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला आहे. विजेतेपदासाठी ऑनलाइन मतदान प्रक्रिया सुरू आहे. ३० नोव्हेंबर रोजी रात्री बारापर्यंत मतदान करता येणार आहे. सात डिसेंबरला निकाल आहे. सद्यःस्थितीत द्वितीय क्रमांकावर शहर आहे. रिपब्लिक ऑफ कोरियातर्फे २०१२ पासून सिटी ऑफ ग्वांगझू, यूसीएलजी आणि मेट्रोपोलिसद्वारे सह-प्रायोजित शहरी नवोपक्रमासाठी ग्वांगझू इंटरनॅशनल अवॉर्ड देण्यात येत आहे.

अवॉर्ड कशासाठी?

ज्ञान निर्मितीला चालना देणे आणि शहरी नावीन्यतेमध्ये शिक्षण सुलभ करणे, यासाठी जागतिक व्यासपीठ म्हणून ‘ग्वांगझू इंटरनॅशनल अवॉर्ड’ संकल्पना उदयास आली आहे. त्यामध्ये गेल्या पाच टप्प्यामधून जगभरात तेराशेहून अधिक उपक्रम सादर केले आहेत. परिवर्तनशील शहरी विकास पद्धतींना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे, हा यामागील हेतू आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहभाग नोंदविला आहे.

अंतिम १५ शहरे

‘ग्वांगझू इंटरनॅशनल अवॉर्ड’साठी अंतल्या (तुर्किये), बोगोटा (कोलंबिया), केपटाऊन (दक्षिण आफ्रिका), ग्वांगझू (कोरिया), हलांद्री (ग्रीस), इज्तापालापा (मेक्सिको), जाकार्ता (इंडोनेशिया), कंपाला (युगांडा), कझान (रशिया), मॅनहाइम (जर्मनी), रामल्लाह (पॅलेस्टाईन), साओ पाउलो (ब्राझील), तेहरान (इराण) आणि झियानिंग (चीन) ही शहरे जगभरातील शहरी नवकल्पनांचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

असा झाला प्रवास

जगातील ५४ देशांमधील १९३ शहरे आणि प्रदेशांमधील तब्बल २७४ उपक्रमांचे ग्वांगझू पुरस्कारासाठी अर्ज आले होते. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडच्या ‘नवी दिशा’ उपक्रमाचा समावेश आहे. पुरस्कार प्रक्रियेतील सादरीकरण मूल्यांकनासाठी ११ ते १४ सप्टेंबर या कालावधीत ग्वांगझू लायब्ररीमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा समावेश असलेली तांत्रिक समितीची बैठक झाली. समितीमार्फत शाश्वत विकास उद्दिष्टे, न्यू अर्बन अजेंडाच्या स्थानिक अंमलबजावणीच्या पाठपुराव्याशी संबंधित बाबींची पडताळणी झाली. निवड प्रक्रिया, नवकल्पना, परिणामकारकता, संदर्भ आणि प्रतिकृती यांसारखे निकष लावले होते. त्यातून निवड झालेल्या ४५ पात्र उपक्रमांपैकी अंतिम १५ शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला आहे.

संकेतस्थळावर आवाहन

महापालिकेने संकेतस्थळावर ‘करू या पिंपरी-चिंचवडला मतदान, वाढेल जगात भारताचा सन्मान’ असे घोषवाक्य दिले आहे. ग्वांगझू अवॉर्डसाठी ‘नवी दिशा’ उपक्रमाचा समावेश आहे. ‘क्यू आर कोड स्कॅन करा आणि मत नोंदवा’ असे आवाहन करत संकेतस्थळावरील ‘लिंक क्लिक’ करून शहराला मतदान करा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान होण्यासाठी मतदान करा,’ असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

काय आहे 'नवी दिशा' उपक्रम

शहरातील महिला करतात सामुदायिक शौचालयांची देखभाल दुरूस्ती

पिॅपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ नवी दिशा’ उपक्रमाअंतर्गत महिलांना रोजगार

वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहरात स्वच्छता राखण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर असते. मात्र या आव्हानाला ‘नवी दिशा’ देत पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील महिलांना या कामात सामावून घेतले आणि गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होतानाच स्वच्छ आणि सुंदर शहराचा प्रवास सुरू झाला. 

शहरातील झोपडपट्टी भागात असलेल्या सामुदायिक शौचालयाच्या देखभाल आणि दुरूस्तीचे काम गरजू महिलांना देऊ करत पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘नवी दिशा’ उपक्रमाअंतर्गत जागतिक नकाशावर आपले वेगळेपण सिध्द केले आहे.

विशेष म्हणजे या उपक्रमाची चीनमधील सहाव्या ग्वांग्झो इंटरनॅशनल अवॅार्ड फॅार अर्बन इनोव्हेशन साठी पहिल्या १५ शहरामध्ये निवड झाली आहे. १९३ शहरांनी या पुरस्कारासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी भारतातील पिॅपरी चिॅचवड हे एकमेव शहर आहे. याच पुरस्काराचा एक भाग म्हणजे ‘सिटी ॲाफ चॅाईस’.

नागरिकांनी त्यांच्या आवडीचे शहर सिटी ॲाफ चॅाईस’ मध्ये घोषित करण्यासाठी पिॅपरी चिंचवड शहराला मत द्यायचे आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी शहराला मत देऊन आपल्या भारतातील पिंपरी चिंचवड शहराला नागरिकांच्या पसंतीचे शहर घोषित करून जिॅकवून देण्याचे आवाहन पिॅपरी चिॅचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

https://vote.guangzhouaward.org/vote.html या लिॅकवर नागरिकांनी मत नोंदवायचे आहे. 

विकासाची गती साधताना समाजातील सर्व घटकांना, विशेषतः उपेक्षित समुहांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने विविध योजना तसेच सर्वसमावेशक धोरणांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेच्या वतीने महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी महिला बचतगटांना ‘नवी दिशा’ उपक्रमांतर्गत सामुदायिक शौचालय देखभाल आणि दुरूस्तीचे काम दिले जात आहे. हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणेची दिशा दाखविणारा असून यातून बचतगटांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.

शहरात झोपडपट्टी भागात राहणार्या नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित शौचालय मिळावे यासाठी पिॅपरी चिंचवड महापालिकेने ७१ झोपडपट्टी परिसरात १६० सामुदायिक शौचालयांची निर्मिती केली. मात्र या शौचालयांची देखभाल करण्याचा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर होता. आणि त्यामुळे सुरूवातीच्या काळात परिसरातील नागरिकांनी शौचालय वापरण्यास नकार दिला. ही बाब लक्षात घेत पिॅपरी चिॅचवड महापालिकेच्या सामाजिक विकास विभाग आणि आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात  महिलांचा सहभाग आणि शौचालय देखभालीसाठी नागरिकांचा पुढाकार याची कमतरता असल्याचे जाणवले. यातूनच सुरू झाला ‘नवी दिशा - सामुदायिक शौचालय प्रकल्प’

महापालिकेने केलेल्या जागृती अभियानात महिलांना या शौचालयाच्या देखभाल आणि दुरूस्तीसाठी आवाहन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्यातून आज ४० बचतगटातील महिला त्यांच्या परिसरातील सामुदायिक शौचालयाची स्वच्छता करतात. प्रत्येक शौचालय सीटच्या देखभाल दुरूस्तीसाठी प्रति महिना ९०० रूपये मानधन या बचतगटांना देण्यात येते. 

याचा परिणाम म्हणजे ३० हजार नागरिकांना प्रतिदिन स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयाचा लाभ घेता येतो. १४० महिलांना या उपक्रमामुळे रोजगार उपलब्ध झाला असून १६० ठिकाणी उभे असलेले हे सामुदायिक शौचालय आदर्श विकासाचे उदाहरण  आहे.

शहरातील स्वच्छता हा प्रशासनाचा मुख्य हेतू असला तरी स्वच्छता राखताना लोकसहभागातून महिलांना सामील करत त्यांना रोजगार आणि उपजिविकेच्या संधी उपलब्ध करून देणारा पिॅपरी चिॅचवड महापालिकेचा ‘नवी दिशा’ उपक्रम जगभरात आदर्श ठरत आहे.

चला तर मग, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून देऊया, आपल्या भारतातील या शहराला भरघोस मतदान करून ग्वान्गझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊया.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Monday, November 20, 2023

नवी मुंबईकरांचे मेट्रो स्वप्न साकार

ब्बल बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवी मुंबईत पहिली  मेट्रो  (NMM) शुक्रवारी १७नोव्हेंबर २०२३ पासून  दुपारी ३.०० वाजल्यापासून  धावू लागली... आणि नवी मुंबईकरांच्या मेट्रो प्रवासाला उत्साहाने सुरुवात झाली आहे.  पेणधर, तळोजा पेठाली, अमनदूत, पेठपाडा, सेन्ट्रल पार्क, खारघर गाव आणि केंद्रीय विहार स्थानकांवर प्रवाशांनी गर्दी करीत आहेत.  सध्या नवी मुंबईत जी मेट्रो धावत आहे, ती नवी मुंबई मेट्रो लाईन-१ मधल्या पहिल्या टप्प्याची आहे.  हा पहिला टप्पा सीबीडी बेलापूर ते पेंढारपर्यंत सुरू होतो. नवी मुंबई मेट्रो लाईन 1 चे ऑपरेशन नवी मुंबई कनेक्टिव्हिटी सुधारण्यात आणि नवी मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटचा विस्तार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. 

मुंबईसाठीची 'सॅटेलाइट सिटी' म्हणून उभारण्यात आलेल्या नवी मुंबईची गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा विकास आणि असंख्य निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांमुळे नवी मुंबई हा रिअल इस्टेटसाठी महत्त्वाचा  पर्याय बनत आहे. या नियोजित महानगरामध्ये अनेक नामांकित शाळा, जागतिक उपक्रम, रुग्णालये, मनोरंजनाचे मार्ग आणि बरेच काही आढळू शकते. मुंबई शहरातील रिअल इस्टेटच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे अनेक गृहखरेदीदार आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणारे नवी मुंबईकडे वळत आहेत. परिणामी नवी मुंबईतील नागरिकांची संख्या वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येला नजीकच्या भविष्यात  प्रवासासाठी कोणत्याही प्रकारची  समस्या निर्माण होऊ नये, तसेच जलंदरीतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकांणी पोहोचता यावे यासाठी नवी मुंबईत मेट्रोची सुरुवात झाली. 

नवी मुंबईतील  हा मेट्रो  प्रकल्प महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) हाती घेतला असून ह्या प्रकल्पात एकूण ११७.३ किमी लांबीच्या ६ मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. ह्यांपैकी सी.बी.डी. बेलापूर- खारघर- तळोजा- पेंधर- खांदेश्वर- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा  नवी मुंबई मेट्रो लाईन १ चा भाग आहे. नवी मुंबई मेट्रो लाईन-१  तीन टप्प्यात बांधली जात आहे. त्यातील पहिला टप्पा हा बेलापूर ते पेंढार असून 

तळोजा ते खांदेश्वर हा दुसरा  टप्पा आहे. तर तिसरा टप्पा हा MIDC ते पेंढार असा असेल.  यापैकी नवी मुंबई मेट्रो लाईन-१ चा बेलापूर ते पेंढार हा  १२ किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा सुरू झालेला असून त्याच्या बांधकासाठी  १,९८५ कोटी रुपये खर्च आलेला आहे. 

नवी मुंबई मेट्रो (NMM) लाइन-१ चा पहिला टप्पा, बेलापूर ते पेंढार, ११.१० किमी लांबीचा आहे आणि त्यात CBD बेलापूर, सेक्टर ७, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक (खारघर), सेक्टर ११, सेक्टर १४, सेंट्रल पार्क, पेठपाडा, सेक्टर ३४, पंचानंद आणि पेंढार या  ११ उन्नत स्थानकांचा समावेश  आहे. जो आता सुरू झालेला आहे. यामुळे खारघर ते तळोजा या मार्गावर शेअर रिक्षा, बसने प्रवास करणाऱ्यांना किफायतशीर दरात मेट्रोने प्रवास करण्याचा सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे.

नवी मुंबई मेट्रो (NMM) लाइन-१ च्या दुसऱ्या टप्प्यात मेट्रो  MIDC तळोजा स्टेशन २ ते खांदेश्वर पर्यंत धावेल. या टप्प्याचे अंतर हे  १०. ३० किमी लांबीचे असून त्यात MIDC स्टेशन  २, MIDC स्टेशन १, कासाडी, सेक्टर ७ ई (कळंबोली), सेक्टर १३ (कळंबोली), सेक्टर १०  (कामोठे), खांदेश्वर ही ८ 

स्थानके असतील., नवी मुंबई मेट्रो लाईन १ प्रकल्पाच्या  या दुसऱ्या टप्प्यासाठी १५०९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर तळोजा आणि खांदेश्वर सारख्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना प्रवास करणे सोपे होणार आहे. नवी मुंबई मेट्रो लाईन १ चा तिसरा टप्पा पेंढार आणि एमआयडीसी तळोजा दरम्यान जोडणारा आहे. हे २.२ किमी लांब आहे आणि यात फक्त एक उन्नत मेट्रो स्टेशन आहे. या इंटरलिंक स्टेशनची अंदाजे किंमत रु. ५७४ कोटी आहे. 

सध्या खांदेश्वर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) हा प्रस्तावित मेट्रो मार्ग आहे. हा नवी मुंबई मेट्रो लाईन १ च्या तिसऱ्या टप्प्याचा हा एक भाग असेल. हा कॉरिडॉर खांदेश्वर मेट्रो स्टेशनला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी (NMIA) जोडेल. हे अंदाजे ५ किमी लांब असेल आणि मुंबई मेट्रोच्या आगामी गोल्ड लाईन किंवा लाईन ८ ला जोडले जाईल. या नव्या प्रस्तावित भागाचा  नवी मुंबई मेट्रो लाईनचा रहिवाशांना खूप फायदा होणार आहे.  कारण यामुळे नवी मुंबईतील विमानतळावर प्रवेश करणे अधिक सुलभ आणि जलद होईल.

प्रवास तिकीट दरांविषयी : 

नवी मुंबई मेट्रो लाईन १ चाप्रवास दर हा 10 रुपये प्रति २ किलोमीटर आहे.२.४ किलोमीटर अंतरासाठी १४ रुपये, तर ४-६ किलोमीटरसाठी २०  रुपये भाडे असेल. शिवाय, ६-८८ किलोमीटरसाठी २५ रुपये, ८ किलोमीटरसाठी ३० रुपये भाडे असेल.तर १०  किलोमीटरसाठी,  ४०  रुपये असा प्रवास दार आहे. या प्रवास तिकीटासाठी  सिडको, महामुंबई मेट्रो नेटवर्क स्टेकहोल्डर, नवी मुंबई मेट्रो ऑटोमॅटिक फेअर कलेक्‍टिंग (एएफसी) साठी निअर फील्ड कम्युनिकेशन (NFC) फोन आणि क्यूआर कोड वापरण्याची परवानगी देण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञान एकत्रित करण्याचा मानस आहे.

पहिली आणि शेवटची मेट्रो कधी धावणार?

तळोजा-पेंधर वरून सुटणारी मेट्रो बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे. मेट्रोने येणाऱ्या प्रवाशांना बेलापूर रेल्वे स्थानकात उतरून हार्बर मार्गे मुंबई , ठाणे येथे जाणे सोईस्कर होणार आहे. तळोजा-पेंधर मार्गावरून सकाळी ६.०० वाजता पहिली मेट्रो धावते. तर रात्री १०.००वाजता तिची शेवटची फेरी असते. प्रत्येक १० मिनिटांच्या अंतराने  तळोजा-पेंधरमार्गावर मेट्रो  धावते. 

नवी मुंबई मेट्रोची वैशिष्ट्ये 

अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे, मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन (एन्ट्री) आणि  निर्गमनाची (एक्झिट) व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर  पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फुटपाथ), ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. 

रिअल इस्टेट मार्केटवर परिणाम

नवी मुंबई मेट्रो तळोजा, पेंढार, बेलापूर आणि खारघर यांसारख्या प्रमुख निवासी आणि औद्योगिक भागातून जाणार आहे. नवी मुंबईतील या सर्व महत्त्वाच्या भागांना मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे या भागात आणि शेजारच्या प्रदेशातील मालमत्तेची मागणी वाढेल. घरांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे या ठिकाणी आणि मेट्रो मार्गात समाविष्ट असलेल्या कमी ज्ञात प्रदेशांमध्ये मालमत्ता मूल्य १०% ते ३० % वाढेल. उत्तम मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे महत्त्वाच्या व्यावसायिक आणि खाजगी संस्थांसह, नवी मुंबईचे व्यावसायिक केंद्र असलेल्या बेलापूरसारख्या व्यावसायिक क्षेत्रांनाही गती मिळेल. चांगल्या सामाजिक सुविधांमुळे आणि कनेक्टिव्हिटीमुळे, हे क्षेत्र लवकरच गुंतवणुकीवर सकारात्मक परताव्यासह उच्च श्रेणीतील घरांची निवड होईल. मेट्रो मार्गामुळे या ठिकाणी घरांची मागणी आणखी वाढेल असा अंदाज आहे.

सध्या नवी मुंबईतील सतत वाढणारी लोकसंख्या, शहराची वाहतूक समस्या आणि वेगाने होणारे नागरीकरण, शहरीकारण यासाठी नवी मुंबई मेट्रो (NMM) हा सर्वोत्तम उपाय आहे. नवी मुंबईतील सर्व मेट्रो मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी होईल.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Friday, November 17, 2023

क्वीन नेकलेसचे रूप पालटणार आणि फोर्ट परिसरही कात टाकणार... नगर विकास विभागाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच विकास होणार

रीन ड्राइव्ह आणि फ्लोरा फाऊंटन एशियाटिक लायब्ररी परिसरात देश-विदेशांतून येणारे पर्यटक आणि नागरिकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टिकोनातून या परिसराचा हेरीटेज विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे. हे काम कशा पद्धतीने करता येईल याच्या संकल्पनांसाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्था आणि प्रकल्प सल्लागार नेमणुकीसाठी स्वारस्य अभिरूची प्रस्ताव मागवले आहेत. विशेष म्हणजे या परिसराचा विकास करताना नगर विकास विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार केला जाणार आहे. मुंबईत नव्या बांधकामाबाबत नवे नियम लागू करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते, त्याच्या आधारावरच नवी मार्गदर्शक तत्त्वे नगर विकास विभागाकडून जारी करण्यात आली आहेत. 

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पात मरीन ड्राइव्ह परिसरातील नागरी सुविधा, स्वच्छता व सुशोभीकरण कामांचा आढावा घेण्यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मे महिन्यात पाहणी दौरा केला होता. मरीन ड्राइव्ह परिसरातील समुद्राच्या दिशेने उभ्या असलेल्या इमारतींना विशिष्ट प्रकारची रंगरंगोटी करण्यात यावी. तसेच प्रसाधनगृहे, स्वच्छता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो याठिकाणी सुरू करावा, असे स्पष्ट करत, सध्या सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांच्या आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्र्यांनी विविध सूचना केल्या होत्या. 

मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, मॅडम कामा रोड, शामलदास गांधी मार्ग, उत्तरेकडील NCPA, चर्चगेट स्टेशन आणि मंत्रालयाच्या आसपासचा परिसरात नव्या बांधकामांबाबत हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. 

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात नव्या कायमस्वरुपी बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. इमारतींवर पेस्टल रंगाचा वापर अनिवार्य करण्यात आला असून होर्डिंग्सवर बंदी घालण्यात आली आहे. नव्या इमारतींची उंची किती असावी ? याबाबतही नगर विकास विभागातर्फे निर्देश जारी करण्यात आले आहेत. 

येत्या काळात या परिसरात पुनर्विकास प्रकल्पांसाठी विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहे. 

महापालिका मुख्यालयात या पार्श्‍वभूमीवर एका बैठकीचे आयोजन केले होते. यात  मरीन ड्राइव्ह परिसरात समुद्राच्या दिशेने आसन व्यवस्था, खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व सहभागाने प्रसाधनगृह सुविधा येत्या काही दिवसांत करण्यात येईल. पर्यटकांना समुद्र पाहण्यासाठी चांगली, सुखकर जागा मिळेल. त्यादृष्टीने कामाला सुरूवात करण्यात येत आहे, असे महापालिका प्रशासनाकडून नमूद करण्यात आले. 

परिसराचे पुनरुज्जीवन

येत्या काळात मरीन ड्राइव्ह आणि फ्लोरा फाऊंटन ते एशियाटिक लायब्ररी परिसराचा महापालिकेच्या हेरिटेज विभागामार्फत विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे दोन्ही हेरिटेज परिसर असल्याने येथील रस्ते, सार्वजनिक खुल्या जागा आणि मरीन ड्राइव्ह परिसराचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.

सी-साइड प्लाझा, जेट्टी

मरीन ड्राइव्हला दररोज हजारो पर्यटक भेट देतात. या ठिकाणी पर्यटनस्थळ म्हणून एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यात येत आहे. व्ह्युविंग डेकची निर्मिती ही पालिकेच्या नियोजन विभागाकडून केली जात आहे. एकूण ५३ मीटर लांब व ५ मीटर रुंद असा सी साइड प्लाझा नागरिकांना चालण्यासाठी तसेच समुद्र पाहण्यासाठी जेट्टीच्या ठिकाणी तयार करण्यात येत आहे, असे महापालिकेने नमूद केले आहे.

एक किलोमीटर अंतरावर प्रसाधनगृह

मरीन ड्राईव्ह परिसरात येणारे नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर उत्कृष्ट दर्जाचे प्रसाधनगृह उभारण्यात यावे, असेही निर्देश मा. मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यावर, खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व सहभागाने (सीएसआर) दोन प्रसाधनगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. 

'फोर्ट कात टाकणार

दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसरामध्ये 'गेट वे ऑफ इंडिया'  सीएसएमटी रेल्वेस्थानक, जीपीओ, पालिका मुख्यालय, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय इत्यादींसारख्या हेरिटेज वास्तू आहेत. त्यामुळे या परिसराला विशेष महत्त्व आहे. या वास्तूंमुळेच या परिसरात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते.  जागतिक दर्जाच्या वास्तू आणि त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन  फोर्ट परिसराचा मेकओव्हर होणार आहे. सुशोभीकरणाच्या माध्यमातून बृहन्मुंबई पालिकेचा ए विभाग फोर्ट परिसराचा मेकओव्हर  करणार आहे.  फोर्ट परिसराची हेरिटेज वास्तू' ही  ओळख जपण्यासाठी तेथील सुशोभीकरणालाही हेरिटेज लूक देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे.  सुशोभीकरणात रस्त्यांवरील विजेचे खांब आणि इमारतींवर झगमगाट केला जाणार आहे. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूही हेरिटेज लूकमध्ये भर घालतील. 

फोर्ट परिसराच्या मेकओव्हरचे काम  दोन टप्प्यांमध्ये काम केले जात आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्यांवरील विजेचे दिवे लावले जातील. दुसऱ्या टप्प्यात हेरिटेज वास्तूंवर विद्युत रोषणाई केली जाणार आहे. डेकोरेटिव्ह हेरिटेज पोल बसवून विविध रस्त्यांवर रोषणाई केली जाणार आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या पोलचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यातून हेरिटेज पोलची निवड केली गेली आहे. त्याशिवाय रस्त्यांवर कॅन्टिलिव्हर प्रकारचे एलईडी सिग्नल आणि कारंजे बसवणार असून शिल्पांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. भविष्यात  फोर्ट परिसर कात टाकणार आहे, हे नक्की.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Saturday, November 11, 2023

दिवाळी निरोगी वातावरणात साजरी करूया ! सजग होऊया ! स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान २.० अंतर्गत स्वच्छ दिवाळी - शुभ दिवाळी अभियान

रेतर दिवाळी  धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी अवघे काही  तासच शिल्लक राहिले आहेत.  दिवाळी म्हणजे काय? तर  दिवाळी  म्हणजे सुबत्ता आणि समृद्धीचे सेलिब्रेशन.  मग यात दिव्यांची रोषणाई आली, घर सजावटीसाठी  केलेले प्रयत्न आहे, खरेदीची झुंबड आली आणि त्याच्या जोडीने केली जाणारी फटाक्यांची आतिषबाजी आली. 

मात्र दिवाळी सेलेब्रेशनमध्ये आता आपल्याला सावधगिरी ठेवावी लागणार आहे. दुरुस्ती करावी लागणार आहे.  ती म्हणजे  फटक्यांची आतिषबाजीत.  वाढते हवा आणि  ध्वनी प्रदुषणामुळे न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.  दिवाळी निरोगी वातावरणात साजरी करायची की फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणात, याचा निर्णय नागरिकांनी घ्यायचा आहे, असे स्पष्ट करून मुंबई शहरासह महानगर प्रदेशात हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने दिवाळीत फटाके वाजवण्यावर उच्च न्यायालयाने   ५ नोव्हेंबर २०२३ पासून निर्बंध घातले आहेत. त्यानुसार आता केवळ सायंकाळी ८ ते रात्री १० असे तीन तासच फटाके वाजवण्यास  परवानगी असेल.

फटाक्यांवरील निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी पोलीस आणि महापालिका प्रशासनाची राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. ‘‘मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावत असल्याने समतोल राखण्यासाठी दिवाळीच्या काळात फटाके वाजवण्यावर निर्बंध घालणे गरजेचे झाले असून त्यासाठी कालमर्यादा न्यायालय नक्कीच निश्चित करू शकते, असे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाला महापालिका आणि नागरीकांनी सहकार्य  करण्याचे आवाहन केले  आहे. 

दिवाळी निरोगी वातावरणात साजरी करण्यासाठी न्यायालयाने घेतलेले महत्त्व निर्णय पुढीलप्रमाणे - 

  • मुंबई शहरासह महानगर प्रदेशात हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने दिवाळीत फटाके वाजवण्यावर उच्च न्यायालयाने घातले निर्बंध आहेत.  त्यानुसार आता केवळ सायंकाळी ७ ते रात्री १० असे तीन तासच फटाके वाजवण्यास  परवानगी असेल.
  • बेरियम, बोरीक नायट्रेट सारखे विषारी वायू पसरवणारे फटाके वाजवण्यास मनाई. 
  • फटाक्यांवरील निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी पोलीस आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी. न्यायालयाने स्पष्ट आदेश.
  • हवेच्या गुणवत्तेच्या खराब स्थितीकडे लक्ष देण्यासाठी प्राधिकरणांनी एकत्र येऊन पावले उचलण्याची गरज असल्याचे खंडपीठाचे म्हणणे.
  • राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) आणि राज्य आरोग्य विभागाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय समिती न्यायालयाने या वेळी स्थापन केली. ही समिती आदेशांचे आणि कृती आराखडय़ाचे पालन होते की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम करेल.
  • प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने मार्च २०२३ मध्ये जाहीर केलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल.
  • कृती आराखडय़ाचे पालन करण्यात त्रुटी राहिल्यास प्रभागाच्या सहायक आयुक्ताला वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाणार
  • मोकळ्या जागेत विशेषत: कचराभूमीवर कोणताही कचरा टाकला जाणार नाही याची जबाबदारी नागरीक आणि महापालिकांची असेल. 


स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ : 

फटाक्यांच्या आतिषबाजीवर  सरकारने निर्बंध घातल्यानंतर  स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ हे अभियान सुरूकरण्यात आले आहे. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या‍ दिवाळी उत्सवामध्ये ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ हे अभियान जाहीर करण्यात आले असून दिवाळी कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी केले आहे. या अभियानामध्ये लोकसहभागातून  स्थानिक स्वराज्य संस्था विविध उपक्रम राबवित असून स्वच्छता आणि प्रदूषण प्रतिबंधातून पर्यावरण संरक्षण या बाबीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

या अनुषंगाने दिवाळीपूर्वी घरोघरी केल्या जाणा-या साफसफाईमध्ये नागरिकांकडून त्यांना नको असलेल्या चांगल्या वस्तू मोठया प्रमाणावर कच-यामध्ये टाकून दिल्या जातात. वास्तविकत: या वस्तू गरजूंच्या वापरात येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी साफसफाईतून बाजूला काढलेल्या अशा नको असलेल्या वस्तू  महानगरपालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या थ्री आर सेंटर्समध्ये आणून ठेवाव्यात असे आवाहन  स्थानिक स्वराज्य संस्थानी नागरिकांना केले आहे. , जेणेकरुन ज्यांच्या उपयोगी पडतील असे गरजू नागरिक त्या वस्तू सेंटर्स मधून घेऊन जाता येणार आहेत  ‘नको असेल ते दया, हवे असेल ते घ्या’ या आगळया वेगळया संकल्पनेवर आधारित ‘आहे रे’ वर्गाला ‘नाही रे’ वर्गाशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने स्थानिक संस्थानसाठी सुरू केले आहे. 

पर्यावरणपूरक स्थानिक उत्पादनांचा वापर करणे, एकेरी प्लास्टिकचा वापर टाळणे, टाकाऊ पासून टिकावू वस्तू तयार करणे, प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना करणे व पर्यावरणपूरक फटाक्यांचा वापर करणे हे अभियानाचे निकष आहेत. या मोहिमेत सहभाग घेण्यासाठी MyGOV पोर्टलवर स्वच्छ दिवाळीची शपथ घेऊन वैयक्तिक प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, तसेच स्वच्छ, पर्यावरणपूरक तसेच सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळून दिवाळी साजरी करावी. जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छ दिवाळीची ऑनलाइन शपथ घ्यावी व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करतानाचे व्हिडिओ अपलोड करावे. असे  आवाहन सरकारने केले आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Tuesday, October 31, 2023

पिंपरी चिॅचवड महापालिका शाळांचे शिक्षण बदलतेय, नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण

हापालिका शाळांच्या शैक्षणिक कक्षा रुंदावत  आहेत. त्याचे चालते-बोलते उदाहरण आहे, पिंपरी चिॅचवड महापालिकांच्या शाळा. मुलांना शिक्षणाचे गोडी लागावी ततसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती थांबावी यासाठी महापालिका नावीन्यपूर्ण उपक्रमांचे भरवत आहे.   करिअर मार्गदर्शन देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना तणाव आणि दडपणांचा सामना करण्यास मदत करण्यासाठी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने  आपल्या नागरी शाळांसाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.  प्राथमिक शाळांमध्ये क्रीडा आणि कला शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी शाळांमध्ये वर्ग ग्रंथालयांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. शाळांमधून वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी सक्षमपणे होण्यासाठी ११ प्राथमिक आणि ६ माध्यमिक शाळांमध्ये तंत्रस्नेही, होतकरू, कार्यमग्न शिक्षकांची  निवड करण्यात आली आहे. अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्याच्या इतर कला गुणांना वाव मिळण्यासाठी प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा हा उपक्रम भरवला जात आहे. ताज्या शालेय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हास्तरावर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी  भारतदर्शन सहलीचे आयोज करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी  मनपाच्या रुग्णालयाकडून आरोग्य तपासणी केली आते आहे. एकंदरीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तसेच शैक्षणीक विकासासाठी प्रयत्नशील आहे. पिंपरी-चिंचवड मधील  महापालिका शाळांचा दर्जा बदलण्यासाठी  पिंपरी-चिंचवड महापालिका करीत असलेल्या विविध  उपक्रमांविषयी  थोडे विस्ताराने पुढे दिले आहे. यातील काही उपक्रम हे शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आहेत. तर काही उपक्रम हे  शाळांच्या प्रशासकीय बाबी व भौतिक सुविधांच्या सुधारण्यासाठी केलेले आहेत.    

डाटा एंट्री ऑपरेटर यांची नियुक्ती :  एकीकडे पालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, सध्या शिक्षकांना शासन, पालिकेला विविध अहवाल पाठविणे, संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा डाटा ऑनलाइन भरणे, वैद्यकीय तपासणीची माहिती भरणे, क्रीडा विषय माहिती ठेवणे यासह विद्यार्थ्यांचा सर्व डाटा जतन करणे, संगणकावर एक्‍सेल शीटमध्ये माहिती भरणे यासह विविध कामे करावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी प्रशासकीय आणि इतर कामकाजात शिक्षकांचा जास्त वेळ जात आहे. यामुळे शिक्षकांचे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी १०५ डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण १०५ प्राथमिक, तर १८ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये ४२ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थीसंख्या मोठी असताना महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी पालिकेने सुमारे अडीचशे कंत्राटी शिक्षकांची भरती केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक प्राथमिक शाळेसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. 

प्राथमिक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक व कला शिक्षक नेमणूक : महापालिकेच्या सर्व शाळा स्मार्टकरण्याकडे  पालिका प्रशासनाची कल आहे. याच वेळी विद्यार्थ्यांच्या कला-क्रीडा या गुणांनाही वाव मिळणे गरजेचे आहे.  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधून गोरगरिब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  त्यांना  जास्तीचे पैसे  भरून  कला-क्रीडा आदी शिक्षण घेणे जमत नाही. त्यामुळे  पिंपरी-चिंचवड महापालिकैच्या शाळांमधून ३२ प्राथमिक शाळांसाठी प्रायोगिक तत्वावर कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नेमले जाणार आहेत. या शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

समुपदेशकांची नियुक्ती :   पिंपरी चिंचवड  महापालिकेच्या १०५ प्राथमिक व१८ माध्यमिक शाळांमध्ये जवळपास ४५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. अशा विद्यार्थ्यांना आजूबाजूचे वातावरण, घरातील समस्या याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे त्यांची मानसिकता स्थिर राहत नाही. एखादा विद्यार्थी सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळा वागत असेल तर त्याला कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून घेणे आवश्यक असते.  तर अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या कौटुंबीक प्रतिकूल परिस्थितीचा विचार करत त्यांना मानसशास्त्रीय समुपदेशनाचा लाभ देण्याच्या उद्देशाने सुरुवातीला महापालिकेच्या १०५  'शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.  ५ शाळांसाठी  १ समुपदेशक या प्रमाणात २१ समुपदेशकांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. हे समुपदेशक बाल मानसशास्त्र, मानसोपचार आणि समाजशास्त्रातील तज्ञ आहेत आणि त्यांनी पूर्वी शाळा आणि इतर संस्थांमधील मुलांसाठी समुपदेशक म्हणून बाल कल्याण कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.

वर्ग ग्रंथालय :   शालेय विद्यार्थ्यांमध्ये साक्षरतेला चालना देण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने १०५ पैकी ५० प्राथमिक शाळांमध्ये वर्ग ग्रंथालये उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी पिंपळे गुरव प्राथमिक शाळा क्रमांक ५४ येथे पहिल्या वर्ग ग्रंथालयांचे अनावरण  नुकतेच करण्यात आले. तुलिका, नॅशनल बुक ट्रस्ट, तसेच पराग इनिशिएटिव्ह (टाटा ट्रस्ट), रूम टू रीड आणि आकांक्षा फाउंडेशन यांसारख्या संस्थांनी या ग्रंथालयांसाठी पुस्तकांची निवड बारकाईने केली आहे. उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी, एक धोरणात्मक ग्रंथालय अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये पन्नास शाळांमधील प्रत्येकी एका शिक्षकाला सहभागी करण्यात आले. या शिक्षकांना त्यांच्या संबंधित शालेय संस्थांमध्ये ‘लायब्ररी चॅम्पियन’ होण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. तसेच दर आठवड्याला नवनवीन वाचन पद्धती अवलंबण्यात येतील. पद्धतीद्वारे शैक्षणिक परिणामांचे विश्लेषण करण्यात येणार आहे.  ५० प्राथमिक शाळांमध्ये वर्ग ग्रंथालय निर्मितीची प्रक्रिया चालू आहे.  वर्ग ग्रंथालयांसाठी एकूण १ लाख ३८ हजार पुस्तके मागविण्यात आली आहेत. ज्ञानाचा हा खजिना ठेवण्यासाठी वर्गांमध्ये ६७७ कपाटांची सोय करण्यात येणार आहे. ही वर्गातील ग्रंथालये विद्यार्थ्यांमध्ये केवळ वाचनाची आवडच वाढवणार नाहीत तर सुदृढ, सक्षम तरुण पिढी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहनही देणार आहेत. 

कोर टीम  : शाळेत वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी सक्षमपणे होण्यासाठी ११ प्राथमिक व ६ माध्यमिक तंत्रस्नेही, होतकरू, कार्यमग्न शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या शिक्षकांना अदवितीय आणि यशस्वी शैक्षणिक पद्धतींचे अनुभव देण्यासाठी सहयाद्री शाळा खेड व ज्ञान प्रबोधिनी निगडी येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर २०२३ पर्यन्त दिल्ली येथील शाळांच्या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दफ्तर विना उपक्रम : पिंपरी चिंचवड  महापालिकेच्या शाळांमधून प्रत्येक शनिवारी दप्तराराविना शाळा भरते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्व १२८ शाळांमध्ये दर शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या खांद्यावरचा भार हलका झाला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये आता गीत, कविता, गायन, प्रश्नमंजूषा, शाब्दिक खेळ, पाककला, चित्रकला, मैदानी खेळ असे विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला, तसेच पर्यावरणपूरकतेला प्रोत्साहन मिळत आहे.

दप्तराविना शाळा : विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिल्यास त्यांची शाळा उपस्थितीची गोडी वाढेल आणि आठवड्याभराच्या शारीरिक, मानसिक त्रासातून मुक्तता मिळेल, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘दप्तराविना शाळा’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची कल्पकता तर वाढलीच आहे; पण त्यांच्या कौशल्यालाही वाव मिळाला आहे. पालक आणि शिक्षकांनीही या अग्रेसर विचारसरणीचे कौतुक केले आहे. या उपक्रमाने विद्यार्थ्यांना जड दप्तरांच्या शारीरिक ओझ्यापासून मुक्ती तर मिळालीच आहे;  पण त्यांचा मानसिक भारही हलका केला आहे. जिज्ञासा आणि जीवनकौशल्ये यावर भर देऊन महापालिका शाळा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेशीपलीकडे सतत विकसित होत असलेल्या धावपळीच्या जगात हा उपक्रम पाऊल ठेवण्यास नक्कीच मदत करणार. 

भारत दर्शन सहल आयोजन :   महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यावर भर दिला जात आहे. पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षांमध्ये राज्य स्तरावर किंवा गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतदर्शन अभ्यास दौरा आयोजित केला जाणार आहे. त्यासाठीचा येण्या-जाण्यासह राहण्याचा खर्च महापालिका करेल. या अंतर्गत भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो), संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) अशा महत्त्वाच्या संस्थांसह भारतातील विविध स्थळांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. जिल्हास्तरावर कला, संस्कृती, इतिहास, संग्रहालय, विज्ञान व संशोधन विषयक स्थळांची माहिती होण्यासाठी दरवर्षी अभ्यासदौरा आयोजित केला जाणार आहे.  यंदा राज्य शालेय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हास्तरावर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना साऊथ रूट येथील ऐतिहासिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक स्थळांना भेटीचे आयोजन दि. १९ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२३  असे केले आहे.

'जल्लोष शिक्षणाचा' : पिंपरी चिंचवड महानगरपालिका - शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळेंच्या प्रयत्नांना सन्मानित करण्याच्या दृष्टीकोनातून 'जल्लोष शिक्षणाचा' उपक्रम सुरू केला आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये , ८ शाळा प्रभाग विजेत्या म्हणून निवडल्या गेल्या होत्या आणि या ८ शाळेंपैकी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची एक शाळा  सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून ओळखली गेली होती. दोन दिवस चालणाऱ्याया उपक्रमात विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारीत कला सादरीकरणाची संधीही मिळाली होती. जल्लोष शिक्षणाचा अंतर्गत  शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक गुणात्मक, नावीन्यपूर्ण विचारवाढीसाठी विद्यार्थी व शाळा स्तरावर स्पर्धा घेतल्या जातात.  थोडक्यात  'जल्लोष शिक्षणाचा' मध्ये  स्पर्धा व शिक्षणोत्सवाचे आयोजन केले जाते. 

जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ : राज्यातील पहिले संतपीठ पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आले. अल्पावधीतच संतपीठाचा लौकीक आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला आहे. सीबीएसई बोर्डाच्या माध्यमातून इंग्रजी भाषेत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबरोबरच संत साहित्याचे शिक्षण देऊन भारतीय संस्कृती व परंपरेची शिकवणे देणे हे संतपीठाचे वैशिष्टय आहे. इयत्ता ज्युनियर केजी ते सातवी पर्यंत एकूण १२५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या वेळापत्रकामध्ये शैक्षणिक विषयांसह संत साहित्य, तबला वादन, पखवाज वादन, श्लोक, अभंग, स्त्रोत, हरिपाठ पठण, संगीत, नृत्य हे विषय मुलांना शिकवले जातात. भारतभर कार्य केलेल्या अनेक संतांच्या जयंतीचे तसेच पुण्यतिथीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची माहिती दिली जाते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेला सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारी सर्वोत्कृष्ठ शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे

गुणवत्ता सुधार प्रशिक्षण :  क्वॉलिटी कंट्रोल ऑफ इंडिया यांच्यासोबत तीन वर्षांसाठी करारनामा केला आहे. यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांचे मूल्यांकन १०० टक्के केले जाते. . त्यानंतर निकालातील त्रूटी लक्षात घेऊन शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. 

प्रकल्प व्यवस्थापन ः शिक्षक, मुख्याध्यापक, सीएसआर अंतर्गत राबविले जाणारे विविध प्रकल्प यांच्यात समन्वय साधणे, माहिती आधारित नियोजन करणे, शाळांमध्ये विविध उपक्रमांचे मूल्यांकन करणे, नविन प्रस्ताव तयार करणे, शिक्षण विषयक पद्धतीमध्ये सुधारणा करणे. बालवाडी व शाळांची गुणवत्ता वाढीस मदत करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन उपक्रम राबविला जातो. त्यासाठी शिक्षण विभागात दोन व क्षेत्रीय स्तरावर पाच असे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले  जाते. 

डी. बी. टी. (Direct Benefit Transfer) - १ली - ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी रु.३५००/- व ५वी १० वी च्या विदयार्थ्यांसाठी रु.३७००/- याप्रमाणे ४१,६६० पालकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.

शाळांकरिता सारथी तक्रार पोर्टलची अंमलबजावणी - शाळांमधील भौतिक सुविधा, तांत्रिक बाबी इ. विषयक तक्रारींचे निवारण वेळेत करण्यासाठी सारथी पोर्टलद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय करण्यात आली आहे. दि.०१/०३/२०२३ ते दि. १२/१०/२०२३ या कालावधीत एकूण २४० तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी २०४ तक्रारींचे निवारण झाले आहे. 

भौतिक सुविधा अद्ययावत करणे व वॉटर फिल्ट सुविधा देणे - गेल्या वर्षी  २०२२ मध्ये ३७ प्राथमिक शाळांमध्ये भौतिक सुविधा अद्ययावत करण्याचे काम सुरू केले होते. या वर्षी ६८ प्राथमिक शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू होणार आहे. मनपाच्या सर्व शाळांतील इमारतीमध्ये वॉटर फिल्टर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 

ज्ञानमेव शक्ति: मनपा शाळांसाठी एक सारखे नाव असावे याकरिता पी.सी. एम.सी. पब्लिक स्कूल हे नाव आणि "ज्ञानमेव शक्ति:" असे ब्रीदवाक्य निश्चित करण्यात आले आहे.

ऑनलाइन शिक्षक बदली - उपशिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बाला प्रकल्प व AIप्रकल्पापैकी  ४० शाळांमध्ये बाला प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यासाठी १,२३,००० स्क्वे. मी. क्षेत्रात काम करणेत आले आहे.

मनपा तर्फे विद्यार्थी आरोग्य तपासणी - सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीसाठी मनपाच्या रुग्णालयांकडून करण्यात येईल. ही तपासणी  स्मार्ट हेल्थकेअर अंतर्गत  शैक्षणिक वर्षात जुलै, ऑगस्ट आणि डिसेंबर, जानेवारी या महिन्यांत सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठी वेळापत्रक तयार केले असून शारीरिक दोष असलेल्या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केले जातात. 

अशाप्रकारे पिंपरी-चिंचवड महापालिका  आपल्या शाळांमधून विद्यार्थ्याचे भवितव्य उज्जवल करण्यासाठी प्रयत्नशील आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...