Monday, June 17, 2024

काय आहे मुंबई महापालिकेचा 'वातावरणीय अर्थसंकल्प २०२४-२५ अहवाल' ?

मुंबईतील प्रदूषण करण्यासाठी पालिका प्रशासनाने गेल्यावर्षी कृती आराखडा तयार केला होता. या कृती आराखड्यातील कृती आणि शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागाने पहिला वातावरणीय अर्थसंकल्प तयार केला आहे. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्यावतीने पहिला 'वातावरणीय अर्थसंकल्प २०२४-२५ अहवाल'चे  प्रकाशन अतिरिक्त महापालिका मा. आयुक्त (शहर) श्रीमती  अश्विनी जोशी यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात केले. मुंबई महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या कामांमध्ये, तसेच प्रकल्पांमध्ये पर्यावरणपूरकता यावी, यादृष्टीने मुंबई महापालिकेने वातावर्णीय अर्थसंकल्पात नियोजन केले आहे.  वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल सादर करणारे मुंबई हे जागतिक स्तरावरील चौथे शहर ठरले आहे. 

मुंबईतील वातावरणातील बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महापालिकेच्या वतीने अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.  मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण प्रकल्प, मलनिःसारण प्रचालन, पाणीपुरवठा प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता यांचा पर्यावरणाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध येतो. या विभागामार्फत हाती घेतले जाणारे प्रकल्प किंवा राबवल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देणे हा या अर्थसंकल्पामागील प्रमुख उद्देश आहे, या अहवालात मुंबई वातावरण कृती आराखड्याचाही समावेश आहे. यामध्ये वातावरणविषयक लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. वातावर्णीय अर्थसंकल्पात  महापालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भांडवली खर्चासाठी ३१ हजार ७७४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी अंदाजे १० हजार २२४ कोटी २४ लाख रुपये म्हणजेच ३२.१८ टक्के रकमेची तरतूद या अहवालातील मुंबई वातावरण कृती आराखड्यासाठी आहे,. 

अर्थसंकल्पाची प्रक्रिया

  • वातावरणाशी संबंधित असलेल्या मुंबई महापालिकेच्या २० विभागांसोबत सल्लामसलत करून अर्थसंकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.

  • मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये ऊर्जा आणि इमारती, एकात्मिक गतिशीलता, शाश्वत कचरा व्यवस्थापन, शहरी हरित आणि जैवविविधता, वायू गुणवत्ता आणि शहरीपूर, जल संसाधन व्यवस्थापन या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.


सी-४० शहरे या उपक्रमात मुंबई

वातावरणीय अर्थसंकल्प तयार करण्याबाबात जागतिक स्तरावर हाती घेण्यात आलेल्या सी-४० शहरे या उपक्रमांत मुंबईही एक भाग आहे. यापूर्वी ऑस्लो, लंडन आणि न्यूयॉर्क या शहरातील प्रशासनांकडून असा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. आता अशा प्रकारचा अहवाल प्रकाशित करणारे मुंबई हे जागतिक स्तरावरील चौथे शहर बनले आहे. मुंबई महापालिकेने मार्च २०२२मध्ये मुंबई वातावरण कृती आराखडा प्रकाशित केला आहे. हा आराखडा मुंबईतील हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि शहरांच्या वातावरण बदलातून येणाऱ्या जोखमींचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करणे, पॅरिस कराराची उद्दिष्टे साध्य करणे यासाठी दिशादर्शक मानला जातो.

अहवालाचे महत्त्व

  • वातावरणीय अर्थसंकल्प अहवालाच्या माध्यमातून मुंबईशी निगडीत पर्यावरणपूरक धोरणे, कृती आदींना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल. तसेच यामुळे वातावरणपूरक उपक्रमांची अंमलबजावणी, मूल्यमापन,संनियंत्रण अधिक सक्षम करता येणार आहे.

  • शास्त्रीय पद्धतीने उत्सर्जन कमी करण्याचा आणि वातावरणीय लवचिकता सुधारण्याच्या दृष्टीने मुंबईसाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.


वातावरणीय अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.  क्लायमेट ॲक्शन प्लॅनमधील नोंदीनुसार, गेल्या काही वर्षांपासून मुंबईत अतिवृष्टीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईतील ३५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही पालिकेने पूरप्रवण म्हणून नोंदविलेल्या ठिकाणांच्या २५० मीटर अंतराच्या आत राहते. शिवाय हवेतील पीएम २.५ आणि पीएम १० या धूलिकणांचे वाढते प्रमाण विविध उपाययोजनांद्वारे कमी करणे आवश्यक आहे. नायट्रोजन डायऑक्साइड हा मुंबईतील एक प्रमुख प्रदूषक आहे. मात्र, २०१९ पर्यंत सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड आणि अमोनियाची सरासरी पातळी वाढत आहे.

मुंबईतील २८७ ठिकाणे ही भूस्खलनप्रवण आहेत, त्यापैकी २०९ ठिकाणे ही अस्थिर बांधकामे व सामाजिकदृष्ट्या असुरक्षित असलेल्या वस्त्यांमधील आहेत. या विविध प्रमुख जोखमीपासून मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी क्लायमेट अॅक्शन प्लॅन पालिकेकडून राबविण्यात येणार असून, हा अर्थसंकल्प याचा एक महत्त्वाचा भाग आहे. अॅक्शन प्लॅननुसार मुंबईसाठी २०३० पर्यंत २७ टक्के आणि२०५० पर्यंत ७२ टक्के उत्सर्जन कमीहोईल, असे लक्ष्य निश्चित केले आहे.

अर्थसंकल्पाच्या मदतीने टप्प्याटप्प्याने हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि 'एमकॅप'ची प्रगती मोजण्यासाठी वातावरण परिणाम विश्लेषण बळकट करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

हा 'वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल २०२४-२५' ची सविस्तर माहिती https://mcap.mcgm.gov.in/ या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Friday, June 14, 2024

पर्यावरणाची कास धरून शहर विकसित करू !

र्यावरणपूरक शहरे अशी  बदलत्या आधुनिक शहरांची ओळख बनत आहे. ही ओळख निर्माण करण्यासाठी राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था विविध उपक्रम राबवित आहेत. नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरणदिनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी  निरनिराळे उपक्रम राबिविले. वृक्ष लागवड हा त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम, तर मुंबई महापालिकेने जाहीर केला वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल, अशाच काही उपक्रमांची माहिती देणारा हा लेख

मुंबई महानगरपालिका :  जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पहिला 'वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल' प्रकाशित करण्यात आला. मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. घनकचरा  व्यवस्थापन विभाग, पर्जन्य जल वाहिनी, मलनिःसारण विभाग या विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामातून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी वातावरणीय कृती आराखडा निश्चित केला असून, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते अहवाल जाहीर करण्यात आला. यंदाच्या २०२४- २५ च्या वातावरणीय अर्थसंकल्पात ३१, ७७७.५१ कोटींच्या तरतुदींपैकी ३२.१८ टक्के म्हणजेच १०,२२४.२४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया, शाळांच्या छतावर सौर पॅनल, बांधकाम इमारतींवर एलईडी दिवे, वृक्षरोपण आदी काम करण्यात येणार आहे. तर २ हजार १६३.८ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.  'वातावरणीय  अर्थसंकल्प तयार करणाऱ्या १३ जागतिक शहरांपैकी मुंबई हे एक शहर आहे. वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल २०२४-२५ हा https://mcap.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.

वातावरणीय अर्थसंकल्प अहवालातील महत्त्वाचे मुद्दे - 

  • वातावरणीय अर्थसंकल्प अहवालाच्या माध्यमातून मुंबईशी निगडित धोरण, कृती व अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये वातावरणीय वचनबद्धतांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल. तसेच यामुळे वातावरणपूरक उपक्रमांची अंमलबजावणी, मूल्यमापन, संनियंत्रण अधिक सक्षम करता येईल.

  • हा अर्थसंकल्प तयार करताना वातावरणाशी संबंधित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या २० विभागांसोबत सल्लामसलत करून वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.

  • मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये ऊर्जा आणि इमारती, एकात्मिक गतिशीलता, शाश्वत कचरा व्यवस्थापन, शहरी हरित आणि जैवविविधता, वायू गुणवत्ता आणि शहरी पूर आणि जल संसाधन व्यवस्थापन या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका  :  आमची जमीन, आमचे भविष्य आम्ही जनरेशन रेस्टोरेशन आहोत' या संकल्पनेनुसार  नवी मुंबईत  पर्यावरण दिन साजरा करण्यात आला . जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आपल्या शाश्वत भविष्यासाठी नवी मुंबईतील शासकीय, निमशासकीय अशासकीय कर्मचारी, सुजाण नागरिक, व्यापारी, युवक- युवती, विद्यार्थी सामाजिक सेवाभावी संस्था, महिला बचत गट आदींना किमान एक तरी वृक्षरोप लावण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, यांच्या वतीने करण्यात आले. 

वृक्ष लागवडीसाठी रोपांची आवश्यकता असल्यास, तसेच रोपे लावण्यासाठी जागेची आवश्यकता असल्यास नवी मुंबई महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली.  रोपांसाठी पालिकेने अधिकृत प्रतिनिधींचे संपर्क क्रमांक जाहीर केले.  पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभागी व्हावे आणि सर्वांनी एकत्र येऊन आपले नवी मुंबई शहर हरित करण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले होते. आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या राहत्या परिसरात रोपांची लागवड केली. 

पावसाळ्याच्या कालावधीत माझी वसुंधरा अभियानामध्ये नवीमुंबई महानगरपालिकेने दीड लाख देशी वृक्षरोपांची लागवडीचे नियोजन केले असून हे वृक्ष  जैवविविधता वाढवणारे आहेत. यात  १०० जांभूळ व २०० बांबूच्या वृक्षरोपांची लागवड  करण्यात येईल. या वृक्षलागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ ५ जून, जागतिक पर्यावरण दिनी मुंबई महानगरपालिचे मा. आयुक्त  डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.  नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात चाणक्य सिग्नलजवळ पूर्वेकडील बाजूस जांभूळ आणि पश्चिमेकडील बाजूस बांबूच्या वृक्षरोपांची लागवड केली.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आंब्याच्या कोयी संकलनाची विशेष मोहीम राबविली जात असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. शहरातील सोसायट्यांमधून तसेच ज्युस सेंटर्स, रेस्टॅरंट्स व हॅाटेल्स अशा ठिकाणांहून या आंब्याच्या कोयी करण्यासाठी दोन परिमंडळांसाठी स्वतंत्र वाहन तयार करण्यात आले असून कोयी संकलन मोहीम संकलित व्यापक प्रमाणात सुरू करण्यात आली आहे.

या मोहीमेत सहभागी होण्याचे सर्व प्रसार माध्यमांतून आवाहन करण्यात आले असून आयुक्तांनी आवाहन केलेली व्हिडिओ क्लिपही प्रसारित केली आहे.

महापालिकेच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या समाज माध्यमांवर तसेच व्हॉट्स अॅप संदेशांव्दारे नागरिकांकडून या अभिनव उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले असून नागरिक आपल्याकडील आंब्याच्या कोयी सुकवून महानगरपालिकेकडे सुपूर्द करीत आहेत. या कोयींचा उपयोग रोपे तयार करणे, औषधें तसेच खतांसाठी केला जाणार आहे. 

ठाणे महानगरपालिका :   जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत  ठाणे महापालिकेने 'मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान' हाती घेतले आहे. या अभियानात १५ ऑगस्टपर्यंत महापालिका क्षेत्रात एक लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या अभियानाचा प्रारंभ जागतिक पर्यावरणदिनी  सकाळी पोखरण रस्ता क्र. ०१, कॅडबरी जंक्शन येथे महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव यांनी बकुळीचे झाड लावून केला.  'मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान'साठी महापालिका क्षेत्रात जागतिक पर्यावरणदिनी वृक्ष प्राधिकरण, खाजगी संस्था यांच्या माध्यमातून सुमारे ५ हजार झाडे लावून करण्यात आली. 

'मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यानिमित्ताने महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. बांबू तसेच, स्थानिक प्रजातींच्या झाडांना या वृक्षारोपण अभियानात प्राधान्य दिले जात आहे.  अभियानासाठी महापालिका यासाठी विनामूल्य झाडे उपलब्ध करून देणार आहे. महापालिकेच्या जागांबरोबरच, सर्व शासकीय संस्था, निमशासकीय संस्था, शासनाचे सर्व विभाग, संरक्षण दल, खाजगी कार्यालये, गृहसंकुले, स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्था यांनी जागा उपलब्ध करून द्यावी असे  आवाहन श्री. राव यांनी केले आहे.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात, तसेच वन विभागाकडे वनीकरणासाठी जागा उपलब्ध असल्यास त्यांच्या सहकार्याने महापालिका हे अभियान राबवेल. त्यात, मा. मुख्यमंत्री श्री.  एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात बाबूंच्या लागवडीलाही प्राधान्य दिले जाणार आहे. 

या अभियानात प्रत्येक विभागाचे पालकत्व महापालिकेच्या त्या त्या विभागप्रमुखाकडे दिले जाणार आहे. या अभियानाचे संयोजन वृक्ष प्राधिकरण विभागाकडून होईल. मात्र, त्याच्यावर देखरेख ठेवणे, ठराविक काळाने झाडांच्या संगोपनाचा आढावा घेणे ही कामे विभाग प्रमुख करतील. त्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागास पुढील वर्षी जागतिक पर्यावरण दिनी गौरविण्यात येणार आहे. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका :  कल्याण-डोंबिवली महापलिका मोकळ्या जागांवर ट्री गार्डन संकल्पना राबविणार आहे.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील रिंग रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले. सध्या सर्वच जण बदलत्या तापमानाने त्रस्त असून वृक्ष लागवड करून त्याचे परिणाम कमी कसे करता येतील यासाठी प्रयत्न करत आहोत, विशेषत: शहरी भागातील हरित क्षेत्र कमी होत आहे. कल्याण, डोंबिवलीतील मोकळ्या जागांवर झाडे लावण्याची मोहीम हाती घेणार आहोत. वनविभाग, महसूल विभाग आणि महापालिकेच्या मालमत्तामध्ये मोठ्या प्रमाणात झाडेलावून ट्री गार्डन ही अनोखी संकल्पनाराबविणार असल्याचे सांगितले.जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्यसाधून कल्याण पश्चिम येथील रिंगरोड परिसरात बकुळ प्रजातीची सुमारे १००झाडे लावली आहे.

उल्हासनगर महानगरपालिका: उल्हासनगरमध्ये जागतिक पर्यावरणदिनी  महापालिका मा. आयुक्त  श्री. अजीज शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

उल्हासनगर शहरातील चारही प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या या स्मशानभूमींच्या परिसरातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. येणाऱ्या आगामी

काळात उल्हासनगर शहरातील स्मशानभूमीमधील कमी जागेत किमान २०० विविध प्रकारच्या प्रजातींची झाडे लावण्याचा संकल्प मा. आयुक्त अजीज शेख  यांनी सोडला. 

पनवेल महानगरपालिका : पनवेल महापालिकेच्यावतीने शहरातील ४८ विविध उद्यानांमध्ये तब्बल ११०० वृक्षांचे रोपणाचा कार्यक्रम पालिकेने जागतिका पर्यावरणदिनी हाती घेतला. पनवेल महापालिका आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या हस्ते खारघर वसाहतीमधील सेक्टर-१२ मधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फड़के उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात पालिका आयुक्त डॉ. रसाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की माणूस हा निसर्गाचा पुत्र आहे. पर्यावरणाचा विकास करणे म्हणजे पर्यावरणामध्ये ढवळाढवळ न करणे, निसर्ग आहे तसे त्याचे जतन करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच महापालिकेने ११०० झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

पनवेल महानगरपालिकेने जागतिक पर्यावरणदिनी  केलेल्या वृक्षारोपणासाठी  वड, पिंपळ, कडूनिंब, ताम्हणफूल, नांद्रुक, आकाशनिंब, बहावा, अर्जुन, बिट्टी, अर्जुन, जांभूळ, करंज, पळस, प्राजक्त, सोनचाफा, अशोक, सप्तपर्णी, कुसूम, बकुळ, कदंब शिसव, सुबाभूळ, नारळ, सिता अशोक, शमी, आपटा या देशी प्रजातींच्या झाडांची निवड केली. एक हजारपेक्षा जास्त रोपांची लागवड करण्यात आली. 

चंद्रपूर महानगरपालिका : जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे  वृक्षारोपण करण्यात आले. चंद्रपूर शहरातील  सरकारनगर येथील मनपाच्या आदर्श उद्यान येथे महानगरपालिका उपस्थित नागरिकांच्या हस्ते विविध प्रजातींच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली.

पर्यावरणपूरक शहरे  ही ओळख निर्माण करण्यासाठी  चंद्रपूर शहर पुढे सरसावले आहे.   चंद्रपूर  महानगरपालिका शून्य कार्बन उत्सर्जनचे ध्येय गाठण्याकरीता विशेष उपाययोजना राबविण्यास सज्ज झाली आहे. चंद्रपूर शहरात शून्य कार्बन उत्सर्जनच्या उपाययोजना राबविण्यासाठी एक आढावा बैठक आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. यात कार्बन उत्सर्जन कमी करण्यास शहरातील पथदिवे बदलुन एलइडी लाइट्सचा वापर करणे, ऊर्जेचा वापर ५० टक्क्यांवर आणणे, सौर ऊर्जेसाठी रेंट अ रूफ धोरण राबविणे, बांधकामात इको फ्रेंडली विटांचा वापर करणे,खाजगी व शासकीय इमारतींवर सोलर पॅनेल बसविणे,विजेचा वापर कमी करून सौर ऊर्जेचा वापर वाढविणे, स्वयंपाकात लाकूड कोळसा या परंपरागत इंधनांचा वापर कमी करणे इत्यादी उपाययोजना राबविण्यासंबंधी चर्चा करण्यात आली आहे.

हवामान बदलावरील बैठकीत भारताने २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्याचा संकल्प केला आहे. या संकल्प अंमलबजावणीच्या पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील मुंबई,नवी मुंबई,पनवेल,ठाणे,अमरावती,नाशिक व चंद्रपूर शहराची निवड झाली आहे.  त्यामुळे  शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्या करीता शहरात नजीकच्या भविष्यात  चंद्रपूर महानगरपालिका विशेष उपाय योजना राबविणार आहे. 

नांदेड-वाघाळा महानगरपालिका :  चंद्रपूर महापालिकेतर्फे 'हरित नांदेड' उपक्रम सुरू झाला आहे. या उपक्रमात  २०२४ च्या मान्सूनमध्ये महापालिका व वृक्षमित्र फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मनपा हद्दीत एकूण २५ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे.'हरित नांदेड अभियान उपक्रमाची सुरुवात  आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते जागतिक पर्यावरणदिनी नांदेडच्या  विसावा उद्यानात प्रातिनिधीक स्वरूपात  वृक्षारोपण करून करण्यात आली. 

धुळे महानगरपालिका :   धुळे शहर व परिसरात ५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प महानगरपालिकेने सोडला आहे. यंदा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेमार्फत मनपा प्रांगणात वृक्ष वाढदिवस कार्यक्रम घेण्यात आला.  पावसाळा सुरू झाल्यावर लगेच वृक्ष लागवड कार्यक्रमास सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील स्वंयसेवी व सामाजिक संस्था, नागरीक, पर्यावरणप्रेमी यांच्या माध्यमातून हरीत धुळे करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्रीमती अमिता दगडे-पाटील यांनी केले. 

मनपा प्रांगणासह परिसरात सुमारे ५ वर्षांपूर्वी वृक्ष लागवड करण्यात आली होती. या वृक्षांची वाढ झालेली असून त्यांचा वाढदिवस यानिमित्ताने साजरा करण्यात आला . "शहरात व परिसरात ५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प असून त्यादृष्टीने मनपामार्फत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. नियोजनबध्द पध्दतीने वृक्ष लागवड व संगोपन कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अभियानाचे यश म्हणजे राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे राबविले जाणारे पर्यावरणपूरक उपक्रम. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमात असलेला लोकसहभाग माझी वसुंधरा अभियानाची लोकप्रियता वाढवित आहे. 

मेट्रो :   कुलाबा-वांद्रे-सीप्झ इथे तयार होत असलेल्या  भूमिगत मेट्रो-३ या मार्गिकेच्या मूळ जागी काही ठिकाणी झाडांची कापणी करावी लागली होती. तर या ठिकाणी  म्हणजेच आरे ते कफ परेड या भूमिगत मेट्रो- ३ जवळ मूळ जागी दोन हजार ६०० झाडांचे रोपण होणार आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनी ही मेट्रो मार्गिका विकसित करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) हा निर्णय घेतला आहे. तसे हमीपत्र  एमएमआरसीने उच्च न्यायालयाला पूर्वीच  सादर केलेले आहे.  मूळ जागी भूमिगत मेट्रोने वृक्षारोपण मोहिमेसाठी निवडलेल्या वृक्षांच्या प्रजातींमध्ये महोगणी, बकुळ, पिंपळ, सोनचाफा, निलमोहोर, तामण, कदंब, देशी- बदाम, आकाश- नीम, स्पाथोडिया, ताबेबुया, अम्ब्रेला-वृक्ष, सप्तपर्णी, पिंपळ, पांगारा, जंगली बदाम, चाफा यांचा समावेश आहे.

दरम्यान, 'एमएमआरसी'ने सीप्झ, एमआयडीसी, शीतलादेवी दादर, सायन्स सिद्धिविनायक, म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड या १३ मेट्रो स्थानकांजवळ ५०० हून अधिक झाडे आतापर्यंत लावली आहेत. निवडलेल्या झाडांमध्ये फुलांची, शोभेची, सदैव हिरवीगार सात वर्षे वयाची आणि सर्वसाधारण १५ फूट उंचीची आहेत.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Thursday, June 6, 2024

आपत्तींशी दोन हात करण्यासाठी आम्ही सज्ज !

पावसामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांपर्यंत तात्काळ मदत पोहोचवता यावी, यादृष्टीने  नगरविकास विभागाशी संबंधित राज्यातील विविध यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. आपत्तीमुळे गंभीर स्थिती निर्माण न व्हावी याकरीता संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. संस्थांनी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी व्युव्हरचना आखली आहे.  त्या व्युव्हरचनेविषयी -  

मुंबई महानगर पालिका : मुंबई  महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. विविध उपाय आणि मदत देण्यासाठी तयारी ठेवली आहे. बचाव पथके, हेल्पलाइन क्रमांक, सीसीटीव्ही प्रणाली यंत्रणा तयार झाले आहेत.  मुंबई पोलिसांमार्फत बसवलेल्या ५ हजार सीसीटीव्हीचे प्रक्षेपण पाहण्यासाठी व्हिडीओ वॉल आणि एकूण दहा हजार सीसीटीव्ही प्रस्तावित असून त्यापैकी अनेकांची कामे पूर्ण होत आली आहेत. त्यामुळे अधिकाधिक सीसीटीव्हींची मदत यंदाच्या पावसाळ्यात मिळणार आहे. मुंबईतील सखल भाग, वाहतूक या सर्वांवर सीसीटीव्हींची नजर असेल.

पावसाळ्यात मोठ्या भरतीच्या दिवशी समुद्रात बुडण्यासारख्या घटना घडू नयेत, यासाठी सहा जीवरक्षक, अग्निशमन दल जवान, पोलिस पेट्रोलिंग वाहने तैनात असतील. अग्निशमन दलाकडून सहा रेस्क्यू बोट, ४२ लाइफ जॅकेट्स आदी तयार असतील. कुलाबा, वरळी, मालाड, मानखुर्द आणि घाटकोपर येथे नौदलाची पाच पूर बचाव पथके तयार ठेवली आहेत. आणीबाणी प्रसंगी मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तीन तुकड्या अंधेरी क्रीडा संकुल येथे तैनात आहेत, तर लष्कराचे १०० कर्मचारी, जवान तैनात असतील.

अचूक माहिती मिळणार

शहर व उपनगरांत होत असलेल्या पावसाचा प्रत्येक १५ मिनिटांचा अद्ययावत अहवाल आणि कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाजासह अन्य मदत ही स्वयंचालित पर्जन्यमापन केंद्राद्वारे होते. मुंबईत सध्या पालिकेकडून उभारलेली ६० केंद्र आहेत. आणखी ६० केंद्र उभारण्याचे काम गेल्या वर्षीपासून हाती घेतले होते. ते काम पूर्ण झाले असून यंदाच्या पावसाळ्यात जास्तीत जास्त आणि अचूक माहिती महापालिकेमार्फत मिळणार आहे.

धोकादायक ठिकाणांची रेकी

मुंबई अग्निशमन दल, नौदल, लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे अधिकारी, जवान पूर संभाव्य ठिकाण, संभाव्य भूसख्खलनाच्या ठिकाणांची आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची रेकी करतील.

उपाययोजना अशा

भूस्खलनाची शक्यता असणाऱ्या एल या कुर्ला, एन विभाग या घाटकोपर आणि भांडुप एस प्रभागाकरिता  १ जूनपासून  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या दोन तुकड्यांचे तीन तुकड्यांमध्ये विभाजन करण्यात आलेआहे. या ठिकाणच्या स्थानिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर माहितीफलक लावण्यात येत आहेत.

हॉटलाइन्स तयार

चार हॉटलाइन्सद्वारे मुख्य आपत्कालिन व्यवस्थापन कक्ष, संबंधित सहायक पोलिस आयुक्त, अग्निशमन केंद्र आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थेतील पर्यायी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल. डिझास्टर मॅनेजमेंट मुंबई महापालिका अॅप, संकेतस्थळ, एक्स हॅण्डल, मोबाइल चॅटबॉट क्रमांक- ८९९९२२८९९९ ही सुरू करण्यात आला आहे.   पोलिस, मेट्रो, एमएमआरडीए, एमआरआयडीसी, रेल्वे, हवामान खाते, एनडीआरएफ, नौदल अन्य यंत्रणांशी समन्वय साधत मुंबई महानगरपालिका पावसाळ्यातील आपतींचा सामना करणार आहे. 

ठाणे महापालिका : ठाणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या संभाव्य पूर आणि पाणी साठण्याच्या घटना यांची आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि संबंधित यंत्रणा यांना आगावू सूचना देणाऱ्या सहा सेन्सर्सच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. परिणामी ठाणे महापालिकेला संभाव्य आपत्तीचे व्यवस्थापन अत्यंत प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे.

ठाणा कॉलेज, वृंदावन पंपिंग स्टेशन, साकेत पाइपलाइन, मुंब्रा स्मशानभूमी, हिरानंदानी इस्टेट आणि गायमुख वॉटरफ्रंट या सहा ठिकाणी हे स्वयंचलित सेंसर्स काही वर्षांपासून कार्यरत आहेत.  पावसाचे प्रमाण जास्त असल्यास त्यांची सूचना या सेन्सर्सच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये सूचना दिली जाते. त्यानुसार, मग संबंधित विभाग, प्रभाग समिती, व्यवस्थापन विभाग यांना तातडीने संदेश पाठवले जातात. त्यामुळे, पूरस्थिती, पाणी साठणे आदींचा सामना करणे यंत्रणेला शक्य होते. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात साठणारे पाणी, भरतीच्या काळात असताना पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्यापासून होणारा अडथळा, महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे, नाल्यातील कचऱ्याचा उपद्रव आदींमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही प्रसंगात जीवितहानी होण्याचीही भीती असते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून ही पूरसदृश स्थिती कशी हाताळायची, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका : पावसाळ्यात कोणतीही आपत्ती घडू नये यासाठी सर्व प्राधिकरणांनी दक्ष राहावे. परस्पर समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. शहरात भरतीच्या काळात १४ ठिकाणी पाणी साचू शकते. अशा ठिकाणी पाणी उपसा पंप उपलब्ध करून पावसाळापूर्व सुरू असलेल्या कामांवर त्रयस्थपणे परीक्षण करावे, असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. 

आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक शिंदे यांनी आयोजित केली होती. या बैठकीत शहरातील पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. बाजार समिती प्रशासनाने गटारे व नाल्यांची साफसफाई करावी. भाजीपाला, फळांच्या कचऱ्याची पावसाळ्यात योग्य विल्हेवाट लावावी. रेल्वे प्लॅटफॉर्म, रुळांच्या बाजूला असलेल्या नाल्यांची साफसफाई करण्यात यावी. रेल्वे हद्दीतील होर्डिंग्जचे संरक्षणात्मक लेखा परीक्षण तत्काळ करण्यात यावे. एमआयडीसीतील नालेसफाईच्या कामांवर विशेष लक्ष द्यावे, असे आदेश त्यांनी दिले.


सिडको (नवी मुंबई) : अतिवृष्टीमध्ये उद्भवलेल्या आपत्तीवर मात करण्यासाठी सिडको महामंडळाने सालाबादाप्रमाणे नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये २४ तास या नियंत्रण कक्षातून रहिवाशांना मदत केली जाणार  आहे.  सिडको महामंडळाने पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, नावडे, काळुंद्रे, तळोजा, कामोठे या वसाहतींचे हस्तांतरण झाल्याने या वसाहतींना वगळून इतर

सिडको वसाहतींमधील नागरिकांसाठी सिडकोचे हे आपत्कालीन नियंत्रण कक्ष मदत करेल, असेही स्पष्ट केले आहे. सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनच्या तळ मजल्यावरून आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे काम सुरू राहणार आहे. सिडको मंडळाने दिलेल्या माहितीनुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसोबत शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशीही २४ तास हे कक्ष कार्यरत असतील. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग व इतर महत्त्वाच्या विभागांचे कर्मचारी २४ तास रहिवाशांच्या संपर्कात असतील..

आपत्तीवेळी नागरिकांनी हे करावे 

नागरिकांनी आपत्तीवेळी सिडकोच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.नागरिक दूरध्वनी किंवा व्हॉट्सअॅप क्रमांकावर तसेच ई- मेलद्वारे नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधून त्यांच्या तक्रारी  नोंदवू शकतील.

दूरध्वनी क्रमांक : ०२२- ६७९१८३८३/८३८४/८३८५, ०२२-२७५६२९९९

व्हॉट्सअॅप क्रमांक : ८६५५६८३२३८

फॅक्स क्रमांक : ०२२- ६७९१८१९९

ई-मेल : eoc@cidcoindia.com

मुंबई मेट्रो : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कंपनीकडून (एमएमएमओसीडब्ल्यू) मेट्रो २ अ व मेट्रो ७, ही संयुक्त मेट्रो सेवा चालवली जाते. गुंदवली ते अंधेरी पश्चिम मार्गे आरे, दहिसर, मालाड, ओशिवरा अशी आहे. या मार्गाला पावसाळ्यात फटका बसू नये यासाठी प्रशासनाने तयारी केली असून त्यात 'ॲनिमोमीटर'चा वापर केला जाणार आहे. मान्सून दरम्यान हवेच्या वेगाचे निरीक्षण करून मेट्रो कार्यान्वयनाचे अचूक नियोजन करण्याच्या दृष्टीने मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या दहा मेट्रो स्थानकांवर ‘ॲनिमोमीटर' बसविले आहे. हे ॲनिमोमीटर'  वाऱ्याचा वेग अचूकपणे मोजत असल्याने 'रिअल- टाइम' देखरेख करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. ॲनिमोमीटर'कडून येणारी माहिती नियंत्रण कक्षाशी जोडलेली असेल. मुंबई मेट्रोच्या प्रवाशांची सुरक्षितता अबाधित राखण्याच्या अनुषंगाने 'एमएमएम ओसीडब्ल्यू' ने प्रत्येक मेट्रो स्थानकावर ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे फलाट, स्थानकाखालील रस्ता आणि तिकीट सभागृह यासारख्या भागात आहेत. या कॅमेरांच्या मध्यामातून सुरक्षा नियंत्रण कक्षाद्वारे चोवीस तास पाळत ठेवण्यात येत आहे. याच अंतर्गत पावसाळी नियंत्रण कक्षात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेट्रोची अखंडित सेवा सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रतिकूल हवामानामुळे उद्भवणारे कोणतेही धोके कमी करण्यासाठी मेट्रोचा कुशल  टीम २४ तास तीन पाळीत कार्यरत राहणार आहे.

मुंबईतील रस्ते कायमचे खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतले आहे. त्यादृष्टीने अनेक ठिकाणी कामेही सुरू असली तरी सर्व रस्ते काँक्रिटचे होण्यासाठी दोन वर्षे लागणार आहेत. यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे शोधण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही 'पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टम'ची या ॲपची मदत घेतली जाणार आहे. ही यंत्रणा १ जून पासून सुरू झाली असून ती  ३१ ऑक्टोबरपर्यंत कार्यरत असणार आहे. नागरिकांना खड्ड्यांचे फोटो काढून ॲपवर त्याची तक्रार नोंदवता येणार आहे. पालिकेची विभागीय कार्यालये त्याची लागलीच दखल घेऊन ते बुजवण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

अशी नोंदवा तक्रार

नागरिकांना खड्यांचे फोटो काढून त्याची तक्रार पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टम  मोबाइल ॲपवर ठिकाणासह नोंदवता येते. या तक्रारीचे नोटिफिकेशन संबंधित वॉर्डातील रस्ते अभियंत्यांना मिळते. या ॲपमध्ये सर्व विभागीय अभियंत्यांची माहिती त्यांच्या विभागीय हद्दीनुसार फीड केलेली आहे. त्यामुळे नोंदवलेली तक्रार संबंधित अभियंत्यालाच प्राप्त होते. तर, तक्रारदाराला आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली याची माहितीही मिळते. अभियंते खड्डे बुजविल्यावर त्याचा फोटो काढून तक्रार निकाली काढल्याची माहितीही याॲपवर देतील.

वसई-विरार महानगर पालिका : वसई-विरार हद्दीतील काही ठिकाणी गटारांवर झाकणे नसल्यामुळे पावसाळ्यात अपघात होण्याचा धोका असून अशा नादुरुस्त किंवा झाकणे नसलेल्या गटारांची माहिती देण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. यासाठी पालिकेने व्हॉट्सअप क्रमांक जाहीर केला असून पालिकेच्या vvcmc.in  या  संकेत स्थळावरदेखील याबाबत तक्रार नोंदविता येणार आहे. तर प्रभाग समितीनिहाय अभियंत्यांच्या व्हॉट्सॲपवरदेखील छायाचित्रासह तक्रार दाखल करता येणार असून यासाठी पालिकेने अभियंत्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर केले आहेत.

तक्रार नोंदवण्यासाठी प्रभाग  समिती व्हॉट्सॲप क्रमांक

  • सचिन तांडेल  -  ९८९००१८८७८  (प्रभाग समिती ए, बी, सी, ई, एफ)
  • सुरेश शिंगाणे - ९८९२३७४६२९ ( प्रभाग समिती डी, जी, एच, आय) 
  • ए : स्मित गांधी - ७७१९०५०८८८
  • बी : दुर्गेश भाटकर ९८२३५३२४८५
  • सी :  सिद्धार्थ पाटील - ९१५८२०५५५६
  • डी : सचिन नामधरे - ८६६८५०५१५७
  • इ :  सुनित आयरे - ८९८३९७५०३२
  • एफ : परेश पाटील - ९६०७३६६६६०
  • जी :  वरूण गव्हाणकर - ९८५०१९६३२२
  • एच : अंकीत पाटील - ९७६६६८५०४२
  • आय : अनिकेत मोहिते - ८८०६७७८९६७

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी एमएमआरडीएने पूर्ण तयारी केली आहे. एमएमआरडीएआपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला असून १ जूनपासून तो २४ तास कार्यरत राहणार आहे. तसेच पावसाळ्यात उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी विविध मेट्रो प्रकल्पस्थळी १९ आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या माध्यमातून सुमारे ३०० पेक्षा अधिक अभियंते आणि कामगार तैनात करण्यात आले आहेत.

एमएमआरडीएच्या मार्गिकांसह, सांताक्रूझ - चेंबूर लिंक रोड, ऐरोली-काटाई नाका बोगदा व उन्नत रस्ता प्रकल्प, शिवडी-वरळी कनेक्टर, छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्प, सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना त्यासोबतच एमयूआयपी आणि ओएआरडीएस अंतर्गत विविध रस्ते आणि पुलांची कामे केली जात आहेत. प्रत्येक मेट्रो प्रकल्पस्थळी १ अभियंता व १० मजुरांची टीम अशा विविध मेट्रोस्थळी १९ आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या माध्यमातून सुमारे ३०० पेक्षा अधिक अभियंते आणि कामगार तैनात केले आहेत. त्यासोबतच १८ आपत्कालीन केंद्र, १८ देखभाल वाहने, १७ अॅम्ब्युलन्सही २४ तास उपलब्ध असणार आहेत.

येथे संपर्क साधा : या कक्षाच्या माध्यमातून विविध यंत्रणांशी समन्वय साधला जाणार असून हा कक्ष १ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत कार्यरत राहील. तक्रारींसाठी नागरिकांना ०२२-२६५९१२४१, ०२२-२६५९४१७६, ८६५७४०२०९० आणि १८००२२८८०१ या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

अटल सेतूवर देखरेख : 'अटल सेतूसाठी १ अभियंता, १० मजुरांचे आपत्कालीन प्रतिसाद दल स्थापन केले आहे. या सेतूवर गाड्यांद्वारे होणारी तेल गळती किंवा इतर निसरड्या पदार्थांसारख्या संभाव्य स्लिप आणि ट्रीप धोक्यांचे निवारण करण्यासाठी पुलावर वेळोवेळी गस्त घालण्यात येणार आहे.

नागपूर महानगर पालिका : पावसाळ्यात अतिवृष्टीनंतर नागरिकांना तत्काळ मदतकार्य मिळावे, या दृष्टीने नागपूर महापालिकेने  'आपदामित्र' संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.  शहरात ही संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी दिले.  'आपदामित्र' संकल्पना  राबविताना नेमक्या कोणत्या उपाययोजना राबविल्या पाहिजेत यावरही डॉ.अभिजित चौधरी यांनी मार्गदर्शन केले.  'पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अतिवृष्टीमुळे स्थितीत नागरिकापर्यंत यंत्रणा तत्काळ पोहचावी यासाठी झोन पातळीवर आपदामित्रांची नेमणूक करावी. त्यांच्याकडून तत्काळमाहिती घेऊन नागरिकांना मदत कशी मिळू शकेल, यासाठी प्रयत्न व्हावेत',असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच जुन्या झालेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घ्यावे, धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांना नोटीस देण्यात यावी, वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणी तत्काळ पाण्याचा निचरा होईल अशा आवश्यक त्यासर्व उपाययोजना आखून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडतात. त्यामुळे पाणी वाहून जावे, यासाठी नाल्यांची, चेंबरची सफाई तातडीने पूर्ण करून घ्यावी. जीर्ण झालेल्या इमारतींना धोका असतो. ज्या इमारती धोकादायक आहेत, त्यांची यादी तयार करून त्यांची पाहणी करावी, असे त्यांनी सुचविले. जी झाडे कोसळू शकतात, अशा झाडांसंदर्भात तातडीने सर्वेक्षण करावे, पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावे. लवकरात लवकर जुन्या झालेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, धोक्याचे पूल, रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी, या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. कुठलीही विपरीत परिस्थिती उद्भवल्यास २४ तास सेवा देण्यासाठी नियंत्रण कक्षात पुरेसे मनुष्यबळ तैनात करावे, झोन स्तरावरून येणाऱ्या तक्रारींची नोंद करावी, नदी-नाल्यांच्यापाण्याची पातळी वाढल्यास सतर्कतेचा व धोक्याचा इशारा त्वरित देण्यात यावा, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

नाशिक महानगरपालिका : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, पावसाळ्यात संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज झाली आहे. महापालिका मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांमध्ये आपत्कालिन कक्ष स्थापन करण्यात आला असून, २४ तास हा कक्ष कार्यान्वित राहणार असल्याने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे. महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना व आपत्ती व्यवस्थापन कक्ष विभागीय महसूल कार्यालय व पुढे राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संलग्न करण्यात आला आहे. या कक्षासाठी २४ तास कर्मचारी वर्ग तैनात राहणार आहे. ३१ मे पर्यंत शहरातील रस्त्यांची खोदाची कामे बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून रस्ते दुरूस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात धोकेदायक घरे, वाडे कोसळून जीवित व वित्त हानी होण्याचा धोका असल्याने धोकादायक वाडे, घरांचा भाग उतरवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दूषित पाणीपुरवठा टाळणे, काझी गढी मिळकत धारकांना नोटिसा बजावणे, रुग्णवाहिका शववाहिका तयार ठेवणे, रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देणे आदी महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन आराखड्यातील ठळक बाबी अशा…

  • पावसाळी पाण्याचा निचरा करणे.
  • खराब रस्ते दुरुस्ती व पाइपलाइन गटारींची दुरुस्ती करणे.
  • धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची पातळी नियंत्रित ठेवणे.
  • फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त करणे.
  • 24 तास आपत्कालीन पथके सज्ज ठेवणे.
  • मॅन होल बंद करणे, ड्रेनेज चोकअप काढणे.
  • बाधित भागातील वीस पुरवठा बंद करणे.
  • महापालिकेचे धोकादायक विद्युत पोल हटविणे.
  • पूर ओसरल्यानंतर रस्त्यावरील व नदी काठावरील वाहून आलेला कचरा हटविणे.
  • बाधित व्यक्तींची ओळख पटविणे.
  • साथीचे रोग पसरू नये यासाठी औषध फवारणी करणे.
  • रस्त्यावर पडलेले झाड त्वरित उचलणे.
  • बाधित ठिकाणी नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे.
  • चेंगराचेंगरी व अफवांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करणे.

पनवेल महानगरपालिका :  पनवेलमध्ये पावसाळ्यात आपत्ती आल्यास सरकारी विभागांचे आपसातामधील समन्वय असावे तसेच मागील वर्षी आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी यावेळी उद्भवल्यास त्यावर कोणत्या प्रकारे मात करता येईल यासाठी नूकतीच पनवेल महापालिकेच्या मुख्यालयात पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या नेतृत्वाखाली सरकारी विविध विभागांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत अवैध व धोकादायक फलकांवरील कारवाईकडे अनेकांनी लक्ष वेधले.

या बैठकीत पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरीत करताना पोलिस विभागाने सहकार्य करावे असा मुद्दा मांडण्यात आला. महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या अतिधोकादायक शाळा निष्कासित करणे व दुरूस्तीयोग्य शाळांची दुरूस्ती करण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले. पनवेल येथील बसआगारामधील उभारण्यात आलेल्या फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून महापालिकेस सादर करण्याची सूचना आयुक्तांनी केली. तसेच आगारातील खड्डे बुजवणे, बस आगाराशेजारील बेकायदा फलकांवर संयुक्त कारवाईस सहकार्य करण्याची सूचना एसटी महामंडळ विभागास करण्यात आली. अतिवृष्टीत खारघर येथील पांडवकडा परिसर पर्यटकांसाठी धोकादायक ठरतो. त्यामुळे पांडवकड्यापर्यंतच्या प्रवेशव्दार नागरिकांसाठी बंद ठेऊन तेथे जनजागृतीसाठी फलक लावण्याची सूचना यावेळी बांधकाम विभागाला करण्यात आली. आपत्तीवेळी पोलिस विभागानेही महापालिकेला सहकार्य करावे अशी विनंती आयुक्त डॉ. रसाळ यांनी केली. कळंबोली वसाहत सिडको मंडळाने खोल बांधल्याने तेथे भरती आणि अतिवृष्टी एकाच वेळी होत असताना पूरस्थिती वसाहतीमध्ये निर्माण होते. अशावेळी वसाहतीमधील साचलेले पाणी उपसा करण्यासाठी लावलेले मोटारपंप सूरु असणे, उद्दचंन प्रकल्पातील मोटार सूरु असणे गरजेचे असल्याचे मत मांडण्यात आले.

अद्याप शहरातील उद्दचंन प्रकल्प सिडकोने हस्तांतरीत न केल्याने हा मुद्दा या बैठकीत चर्चेत आला. त्यामुळे बंद पंपाची दुरूस्ती करून ते वेळीच वापरता यावे अशी तरतूद करण्याची सूचना आयुक्तांनी केली. पावसाळ्यात ठिकठिकाणचे जनरेटर वेळीच वापरता येतील असे ठेवावेत, अखंडीत विज व्यवस्था महावितरण कंपनीने पुरवठा करावा असेही सांगण्यात आले. सिडको वसाहती हद्दीतील नाले, गटारांची साफसफाई वेळीत पुर्ण करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी अधिका-यांना दिल्या. पनवेल शहराचा पाणी पुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र बसआगाराशेजारी आहे. तेथील विजपुरवठा अखंडीत ठेवण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी कऱण्यात आल्या. अतिधोकादायक इमारतींमधील विज पुरवठा खंडित करणे,  धोकदायक विजेचे खांब व विज वाहिन्या हटविणे, नाल्यामधून टाकण्यात आलेल्या केबल अन्य ठिकाणी स्थलांतरीत करणे, वाढलेल्या झाडांच्या फांद्यामुळे विज पुरवठ्याला त्रास होत असल्याने झाडांची छाटणी करावी अशी अनेक कामे करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे सूरु ठेवणे, राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवावे असेही निर्देश यावेळी देण्यात आले. पालिका हद्दीतील धोकादायक वृक्ष, फांद्यांची छाटणी पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागास देण्यात आली. रस्त्यांची कामे , पाईप लाईन, विज वाहिन्यांची कामे करण्यासाठी वर्क ऑर्डर वाहतूक विभागाला देण्याबाबत महापालिकेच्या संबधित विभागास आयुक्तांनी सूचना दिल्या. पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धुर फवारणी व जंतुनाशके फवारणी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागास दिल्या. थोड्या पावसातही महामार्ग ते काळुंद्रे गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचते त्यामुळे त्याठिकाणी पाईप टाकून पाण्याचा निचरा कऱण्याची सूचना आयुक्तांनी पालिकेच्या मलनिस्सारण विभागास केली.

सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांनी त्यांच्या गाडीतील माईक, बॅटरी ,सायरन व इतर आपत्कालीन परिस्थितीत लागणारे साहित्य, यंत्रे, वाहने हे सुस्थितीत असल्याची खात्री करून घेण्याबाबत सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना  आयुक्तांकडून सांगण्यात आले.  गाढी नदी, काळुंद्रे नदी परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास तेथील नागरीकांना इतर ठिकाणी निवा-याची सोय करण्यासाठी ट्रान्झिट कॅम्प उभारण्याबाबत बांधकाम विभागास आयुक्तांनी सूचना दिल्या.

अशाप्रकारे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाचा आरखडा विविध संस्थांनी तयार केला आहे. त्यानुसार यंत्रणा प्रत्यक्ष कृती करण्यासाठी सज्ज  झाल्या आहेत.



Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 


महापालिकांच्या शाळांचे दहावीच्या परीक्षेत लक्षवेधी यश

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागला. या निकालात कोकण विभागाने बाझी मारली असली तरी महाराष्ट्रातील महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे. राज्यातील महापालिकांच्या  ७० पेक्षा जास्त शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. 

मुंबई : मुंबई  महानगरपालिकेच्या  ७९ शाळांचा शाळांचा १० वीच्या   परीक्षेचा निकाल ९१.५६ टक्के निकाल लागला. यात कुलाबा पालिका माध्यमिक शाळेमधील आयुष रामदास जाधव या विद्यार्थ्याने ९७.४० टक्के गुण मिळवून पालिकेच्या सर्व शाळांत प्रथम येण्याचा मान पटकावला. मुंबई पालिकेच्या २४८ माध्यमिक शाळांमधून एकूण १६ हजार १४० विद्यार्थी दहावीच्या परिक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल ९१.५६ टक्के इतका लागला आहे.

यासह ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले ६३ विद्यार्थी आहेत.  द्वितीय क्रमांक खेरवाडी मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेचा वरुण चौरसिया या विद्यार्थ्याने मिळविला असून,त्याला ९७.२० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तिसरा क्रमांक याच शाळेचा आदित्य वानखेडे या विद्यार्थ्याने मिळविला असून त्याला ९६ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. दरम्यान, सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षकांचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. राजेश कंकाळ आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. राजू तडवी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मा. आयुक्त डॉ.  भूषण गगराणी, आणि मा. उपआयुक्त (शिक्षण) श्रीमती चंदा जाधव यांनी अभिनंदन केले. 

'मिशन मेरिट पुस्तिके'चे यश : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा दहावीचा निकाल वृद्धीसाठी नियोजन करून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोप्या व मोजक्या आशयावर आधारित 'मिशन मेरिट पुस्तिके' ची निर्मिती करून त्याचे वितरण केले. या पुस्तिका  आणि त्यातील प्रश्न विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले. प्रश्न सोडविण्याचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक सराव व्हावा, यासाठी डिसेंबर २०२२ पासून (विद्यार्थी नववीत असतानाच ) दहावी परीक्षेच्या धर्तीवर शालेय स्तरावर पाच सराव प्रश्नपत्रिका पाहून व पाच सराव प्रश्नपत्रिका न पाहता अशा एकूण दहा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या. सर्व शाळांना अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन देण्यात आले होते. तसेच अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देऊन मार्गदर्शनही करण्यात आले. मुलांच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी वेळोवेळी दत्तक अधिकारी व मुख्याध्यापकांच्या सभा घेण्यात आल्या. शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता होती, त्याठिकाणी तासिका तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. पर्यवेक्षणीय अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन वेळोवेळी शिक्षकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यंदा  ७९ शाळांचा १०० टक्के निकाल!

मुंबई महापालिका शाळांचा दहावीचा विचार करता मार्च २०२० मध्ये ९३.२५ टक्के, मार्च २०२१ मध्ये १०० टक्के, मार्च - २०२२ मध्ये ९७.१० टक्के, मार्च २०२३ मध्ये ८४.७७ टक्के व यावर्षी मार्च २०२४ मध्ये ९१.५६ टक्के निकाल लागला आहे.  गेल्यावर्षी ८० शाळांचा १०० टक्के निकाल लागला. यावर्षी मार्च २०२४ मध्ये ७९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.

६३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण

गेल्यावर्षी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५३ होती. यंदा त्यामध्ये दहा विद्यार्थ्यांची वाढ होऊन ही संख्या ६३ झाली आहे.

ठाणे : दहावीच्या परीक्षेतील ठाणे महापालिकेच्या २२ माध्यमिक शाळांचा निकाल ८३.८४ टक्के लागला आहे. गेल्यावर्षी  हे प्रमाण ७०.५७ टक्के एवढे असून  एका शाळेचा निकाल १०० टक्के लागला होता. यावर्षी महापालिकेच्या तीन माध्यमिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.  ठाणे महापालिकेच्या शाळांमधून यंदा १,५२३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी १,२७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुंब्रा येथील कौसामधील शाळा क्रमांक १२ ही मराठी माध्यमाची शाळा, सावरकरनगर येथील शाळा क्रमांक १९ ही उर्दू माध्यमाची शाळा, तसेच, सावरकरनगर येथील शाळा क्रमांक १६ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा निकाल १०० टक्के  लागला. महापालिकेच्या आठ शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला. मराठी माध्यमाचा एकूण निकाल ७३.४० टक्के लागला  मानपाडा आणि घोलाईनगर येथील रात्र शाळांचे एकूण १७ पैकी १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उर्दू माध्यमाचा (०४ शाळा ) निकाल ९१.४४ टक्के, इंग्रजी माध्यमाचा ( ०४ शाळा) निकाल ९६.९६ टक्के आणि हिंदी माध्यमाचा ( ०१ शाळा) निकाल ८७.५० टक्के लागला आहे.

नवी मुंबई : इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत नवी मुंबई महानगरपालीकेच्या शाळांचा निकाल लक्षवेधी लागला आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत नवी मुंबई महापालिकेच्या एकूण २३ माध्यमिक शाळांमधून २८१२ विद्यार्थी  बसले होते. त्यापैकी २६७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण सरासरी निकाल ९३.६१ टक्के एवढा लागला आहे. शाळा क्रमांक ११६, सानपाडा, शाळा क्रमांक ११८, पावणेगांव, शाळा क्रमांक १२२, कोपरखैरणे गाव या ३ शाळांचा निकाल १०० टक्के आहे. शाळा क्र. ११६, सानपाडा येथील पूजा शिवाजी वंजारे ही विद्यार्थिनी ९४ टक्के इतके सर्वाधिक गुण मिळवून नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.

नवी मुंबई महापालिका माध्यमिक इंग्रजी शाळा क्रमांक १२०, दिवागाव या शाळेची  वैष्णवी रमेश राठोड ही विद्यार्थिनी ९३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. १०४, राबाडाच्या विद्यार्थिनी निहारिका वर्मा, अर्पिता यादव तसेच नमुंमपा माध्यमिक इंग्रजी शाळा क्र. १२०, दिवागाव येथील विद्यार्थी स्वहम पीतांबर पात्रा या तिन्ही विद्यार्थ्यांनी   ९१.६० टक्के गुण संपादन करीत नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांतून संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला आहे. एस.एस.सी. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक सुविधा व शैक्षणिक दर्जा याबाबत पालकांमार्फत समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

भिवंडी : दहावीच्या परीक्षेत भिवंडी पालिकेच्या दोन शाळांचा निकाल शंभर टक्के आहे.  भिवंडी पालिकेच्या एकूण ११ माध्यमिक विद्यालयातील ६८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये चाविंद्रा मराठी, नवीवस्ती मराठी शाळा या दोन विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. नवीवस्ती उर्दू माध्यमिक शाळा ९५.५८ टक्के, पद्मानगर तेलगू माध्यमिक शाळा ९२ टक्के, टेमघरपाडा मराठी व कामतघर तेलगू शाळा ८६.४८ टक्के, शांतीनगर उर्दू शाळा ८२.९१ टक्के, अवचितपाडा उर्दू शाळा ६७.८८ टक्के, नारपोली हिंदी शाळा  ६४.२८ टक्के, कामतघर मराठी शाळा  ६१.५३ टक्के, निजामपुरा उर्दू ४५.२० टक्के निकाल लागला आहे. कामतघर तेलगू विद्यालयातील साईविका अंजनेयुलू या विद्यार्थिनीने  ८७.२० टक्के गुण मिळवून सर्व मनपा शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक गंगाधर पुजारी याने ८४.४० टक्के गुण मिळवले तर टेमघर मराठी विद्यालयाची निशा डबलू गोडाइत, पद्मानगर तेलगू  विद्यालयाचा मडुरी राहुल रमेश व नवीवस्ती उर्दू विद्यालयाची चौधरी खुशनाज अब्दुल रहीम अशा तिघांनी ८२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.  सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आयुक्त अजयकुमार वैद्य यांनी अभिनंदन केले.

मीरा-भाईंदर : महाराष्ट्र बोर्डाच्या  दहावीच्या परीक्षेचा मीरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांचा निकाल यावर्षी ९६.९६ टक्के लागला आहे. मीरा-भाईंदर शहरातील दहावीच्या परीक्षेला विविध शाळांतील ५५०४ मुलांनी व ५३४२ मुलींनी अशा एकूण १० हजार ८४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४९१ विद्यार्थी व ५३३४ विद्यार्थिनी असे एकूण १० हजार ८२५ विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरले. त्यापैकी ५२७२ विद्यार्थी व ५२२४ विद्यार्थिनी असे एकूण १० हजार ४९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी मुलांची ९६.०१ व मुलींची ९७.९३ टक्के आहे. मीरा-भाईंदर शहराचा एकूण ९६.९६ टक्के निकाल लागला आहे.

छत्रपती संभाजीनगर : शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. छत्रपती संभाजीनगर  महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी दहावीत विशेष प्रावीण्य मिळवून यशाची परंपरा कायम ठेवली.  महापालिकेतील माध्यमिक शाळांमधील दहावी परीक्षेसाठी ८०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पैकी ७९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ७०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मनपा शाळांचा निकाल ८२.९० टक्के जाहीर झाला. यात दोन शाळांचा निकाल शंभर टक्के आहे. यात माध्यमिक शाळा मिटमिटा व माध्यमिक शाळा यशोधरा कॉलनी (उर्दू) यांचा समावेश आहे. तसेच किराडपुरा येथील उर्दू शाळेचा ९८.१४ टक्के, प्रियदर्शनी मयूरबन कॉलनीतील शाळेचा ९६.३० टक्के, नारेगाव उर्दू शाळेचा ९५ टक्के निकाल लागला आहे.

मिटमिटा येथील शाळेतील अक्षरा दत्तू सोनवणे हिने मराठी माध्यमातून ८८.७० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. या बरोबरच शहाबाझार येथील शाळेतील सिद्दीकी यासीरा हिने उर्दू माध्यमातून ८४.६० टक्के गुण घेऊन उर्दू माध्यमात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासोबतच सिडको एन-७ येथील रोजी डिसूजा ८७ टक्के गुण, मिटमिटा येथील शाळेतील पायल निलेश निंबारे ८४.४० टक्के, नारेगाव उर्दू शाळेतील शेख असमा सादिक ८४ टक्के, शेख अकसा नुरेन मोहम्मद अली ८१.८० टक्के गुण घेऊन प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे मा.आयुक्त जी. श्रीकांत यांनी अभिनंदन केले.

पिंपरी-चिंचवड  : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १८ माध्यमिक शाळांचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९५.५२ टक्के लागला आहे. यामध्ये २३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यांना महापालिकेकडून प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येणार आहेत.  यंदा महापालिकेचे २३ विद्यार्थी लाखाचे मानकरी बनले आहेत. दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवणाऱ्या मुलांना प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते. ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपये देण्यात येतात. तर ८५ ते ८९.९९ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये व ८० ते ८४.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये देण्यात येतात. 

यंदा १८ शाळांमधील २३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये भोसरी माध्यमिक विद्यालयातील ५, कासारवाडी ३, संत तुकारामनगर १, पिंपळे गुरव ३, काळभोरनगर १, पिंपळे सौदागर ५, नेहरूनगर १, निगडी २, फुगेवाडी व रूपीनगर शाळा प्रत्येकी एक विद्यार्थ्याचा समावेश आहे. तसेच ८५ ते ८९.९९ टक्क्यांमध्ये ६२ विद्यार्थी आहेत. त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच ८० ते ८४.९९ टक्क्यांमध्ये १०६ विद्यार्थी असून, त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या १८ शाळांमध्ये चार शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यामध्ये माध्यमिक विद्यालय कासारवाडी, संत तुकारामनगर, खराळवाडी व माध्यमिक विद्यालय क्रीडा प्रबोधिनी या शाळांचा समावेश आहे. तर ९० टक्क्यांच्या पुढे भोसरी माध्यमिक विद्यालय (९५.३९), पिंपळे गुरव (९५.१४), काळभोरनगर (९१.७२), पिंपळे सौदागर (९१.७७) नेहरूनगर (९४.११), केशवनगर (९६.९६), निगडी (९८.९७), फुगेवाडी (९७.५०) व लांडेवाडी माध्यमिक विद्यालय (९१.४८) यांचा समावेश आहे. तसेच सर्वांत कमी निकाल माध्यमिक विद्यालय, पिंपरीनगर (७०.८३) या शाळेचा लागला आहे.

नागपूर  : नागपूर महापालिकेच्या शाळांचा दहावी परीक्षेच्या निकाल लक्षवेधी लागला आहे.  शहरातील महापालिका शाळांचा एकूण निकालाची टक्केवारी ८७.५९ इतकी आहे. यातील आठ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मराठी माध्यमाच्या शाळांचा निकाल ८९.३५ टक्के तर हिंदी माध्यमाचा ८१.४५, उर्दू माध्यमाचा ९८.६१ आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल ८८.६३ टक्के लागला आहे. याशिवाय, मनपाच्या आठ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, अकरा शाळांचा ९० टक्क्यांच्या वर, ६ शाळांचा ७५ ते ९० टक्क्यांदरम्यान लागला आहे

नागपूर मनपाच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल मनपाचे शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी कौतुक केले आहे. मनपाच्या मराठी माध्यमातून अथर्व गयनेवार याने ९५.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, तर हिंदी माध्यमातून आर्यन शाह याने ८४.६० टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. उर्दू माध्यमातून शिफा परवीन मो. नाजीर अहमदने ८६.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर इंग्रजी माध्यमातून जारिया आली सय्यद हिने ८७.६० हिने गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय, दिव्यांग‍ विद्यार्थ्यांमधून धनश्री वट्टीने ८३.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशबद्दल त्यांचे कौतुक करीत  मा. महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छ दिल्या आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकमेव राजमाता जिजाबाई गर्ल्स  हायस्कूलच्या इयत्ता १० वीचा सलग चौथ्यावर्षी १०० टक्के निकाल लागला आहे. या शाळेने दरवर्षीची १०० टक्के  निकालाची परंपरा कायम राखली आहे.  यंदाच्या निकालामध्ये विनायक महेश कुंभार ( ९४.६० % ) प्रथम, हरीप्रसाद संताजी चव्हाण (९४. ०० %)  व्दितीय, तेजस यशवंत कुंभार (९४.४०%) हे विद्यार्थी तृतीय आले आहेत.  वैष्णवी प्रसाद हैबत्ती ८९.९०% , शिवप्रसाद सागर चव्हाण  ८८. ०० % , वैष्णवी बाहासोब काटे  यांनी ८७.४७ %  गुण मिळविले आहेत.  त्याचबरोबर इतर सर्व  विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी  चांगले गुण प्राप्त करून  शाळाचा १०० टक्के निकाल लावला आहे. यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त  के. मंजुलक्ष्मी, उप आयुक्त साधना पाटील व प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या  राजमाता जिजाबाई  गर्ल्स हायस्कूलचा निकाल १०० % लावण्यासाठी शाळेच्यामुख्याध्यापिका अंजली जाधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांचे योगदान लाभले. तर हे यश मिळवण्यासाठी लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या पी एम श्री सावित्रीबाई फुले शाळेचा  इयत्ता १० वीचा निकाल ९८ टक्के लागला आहे. एकीकडे मराठी शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा कल कमी होत असतांना बाबुपेठ येथील पी.एम.श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक मनपा शाळा याला अपवाद ठरली आहे. या शाळेत असलेली  हजारांच्यावर असलेली विद्यार्थी संख्या, शाळेची गुणवत्ता, दर्जेदार शिक्षण आणि विशेष म्हणजे इंग्रजी कॉन्व्हेंट सोडून येथे शिक्षण घेत आहेत. चंद्रपूर मनपाचे मा.आयुक्त श्री. विपीन पालीवाल यांच्या नेतृत्वात मनपा शाळेचा शैक्षणिक स्तर सातत्याने उंचावत असून मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांच्या योगदानाने उत्कृष्ट निकाल देण्यात  पी एम श्री सावित्रीबाई फुले शाळा यशस्वी ठरली आहे.  परीक्षेत शाळेतील दिव्यांग विद्यार्थी साहिल मावलीकर यांने ७१ टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे.

शाळेत २०१४ मध्ये केवळ १०० विद्यार्थीसंख्या होती. तर आज मात्र जवळपास ११०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहे. कॉन्व्हेंट सोडून या शाळेत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुध्दा काही वर्गात लक्षणीय आहे, ही शहरासाठी गौरवाची बाब आहे. शासकीय मराठी शाळेत शिक्षणाची गुणवत्ता वाढविल्यामुळे आणि महानगरपालिका प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे शाळेने हा मैलाचा दगड पार केला आहे. 

एक जमाना होता... महापालिका शाळांच्या शिक्षणपद्धतीवर प्रश्नचिन्ह उठविले जायचे. पण आता महापालिकांच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण पाहिल्यास इथेही दर्जदार शिक्षण दिले जाते; आणि विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष दिले जाते याची प्रचिती येते.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...