Tuesday, April 30, 2024

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांचे मतदार जागृती अभियान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी' अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी  स्थानिक स्वराज्य संस्था युद्धपातळीव काम करीत आहेत. "सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन" (स्वीप)  या उपक्रमातंर्गत स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या शाळांनी मतदार जागृती अभियान  राबविण्यास सुरुवात केले आहे. या अभियानास विद्यार्थी आणि शिक्षकांचा चांगला सहभाग लाभत आहे. 

कोल्हापूर महानगरपालिका : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कोल्हापूर महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थीनींनी रांगोळी रेखाटून मतदार जागृती अभियान आपला सहभाग नोंदवला. रांगोळीच्या माध्यमातून 'व्होट इंडिया', 'जो हैं सच्चा और इमानदार, वही हैं देश का हकदार' असे संदेश दिले.  विद्यार्थीनींनी आपल्या घराच्या परिसरात मतदान जागृती करणारी घोषवाक्य लिहून लावली आहेत. 'जागरूक मतदार लोकशाहीचा आधार', 'मतदान हा अधिकार नाही, तर कर्तव्य सुद्धा आहे' ही घोषवाक्य लक्ष वेधून घेत आहेत.   विद्यार्थ्यांनी पालकांना पात्र लिहून मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहे ते पटवून दिले आहे.  विद्यार्थ्यांच्या मार्फत मतदान जनजागृती बाबत शाळा परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. "सोडा सर्व काम. चला करू मतदान", "मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो", "जन मन का यहा नारा है, मतदान अधिकार हमारा है", "मतदान हा अधिकार नाही, तर कर्तव्य सुद्धा आहे" अशा घोषणा लिहिलेले फलक हाती घेत, नारे देत मतदार जागृती अभियान विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीद्वारे शिक्षकांच्या साथीने राबविले. शिक्षकांद्वारे पथनाट्यांतून  मतदान जनजागृती करण्यात आली. 

जळगाव महानगरपालिका :  जागरुक मतदार हा लोकशाहीचा रक्षक असतो.  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जागरुक मतदारामध्ये मतदान जनजागृती निर्माण कारण्यासाठी जळगाव महानगरपालिकेतर्फे मनपा शाळांमधील इयत्ता ६ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांची काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या चित्रांद्वारे मतदार जनजागृती विषयांवर संदेश संबोधित केले. यावेळी चित्रकला स्पर्धेत सहभागी  विद्यार्थ्यांच्या पालाकांना मतदान करण्याची  प्रतिज्ञा देण्यात आली. 

पनवेल महानगरपालिका :  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४  च्या पार्श्वभूमीवर  पनवेल महापालिकेच्या लोकनेते दि.बा पाटील विद्यालय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा पोदी यांच्यावतीने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरी काढण्यात आली. या उपक्रमात शाळेच्या सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या प्रभात फेरीमध्ये सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी "मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो...",  "वोट देने जाना है... देश को आगे बढाना है... ", "आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान"  अशा घोषणा देत नागरीक, व्यावसायिक, फळ, भाजी विक्रेते या मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती केली. महापालिका शाळा क्रमांक ४ मध्ये रांगोळी  स्पर्धांच्या माध्यमातून महापालिकेद्वारे विद्यार्थ्यांच्या मदतीने  मतदार जनजागृती करण्यात आली.  पनवेल मनपा शाळा क्रमांक ८ च्यावतीने मतदानावर आधारित घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली;  तर गुजराती शाळा क्रमांक ९ मध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्तीचा वापर करून सुंदर अशी चित्रे व रांगोळ्या व घोष वाक्य लिहिल. 

सुमारे २ लाख विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ‘मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे, हे कर्तव्य बजावत असताना सुजाण नागरिक म्हणून तुम्ही निवडणुकीत मतदान करा’ अशा आशयाच्या पत्रांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर महापालिकेच्या लोकनेते दि.बा.पाटील विद्यालयामध्ये पालकसभा व व्यवस्थापन समितीच्या सभा घेऊन ‘ देशाची लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी नागरिकांनी मतदान करणे गरजेचे असल्याचा’ संदेश पालकांना देण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर महापालिका :  छत्रपती संभाजीनगर महापालिकेने गुढीपाडवाच्या दिवशी  शहरांतून निघणाऱ्या शोभायात्रांमधून मतदार जागृती केली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रियदर्शिनी शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी पथनाट्य केले आणि शाळेलगतच्या वसाहतींमधून शोभायात्रा काढली. शोभायात्रेत प्रियदर्शिनी शाळेच्या विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या गारखेडा व उस्मानपुरा शाळेचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. 'गुढीपाडवा, मतदान वाढवा' असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. शोभायात्रेत सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमांतर्गत पालक मेळावा घेण्यातआला. उस्मानपुरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन केले. 

चंद्रपूर महानगरपालिका : लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून "सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन" (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा आरंभ चंद्रपूर महापालिकेने मनपा शाळांपासून केला. स्वीप अंतर्गत चंद्रपूर मनपाने शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र लिहून घेत,  पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.  संकल्पपत्रातील  संदेशानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहुन निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले. 

लोकशाहीच्या मजबुतीकरणात शिक्षण क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा आहे. हे पुन्हा एकदा  'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४'च्या  जनजागृती अभियानास विद्यार्थी आणि शिक्षक  वर्गांनी सहभाग नोंदवून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४ : मतदारांसाठी लक्षवेधी ठरणाऱ्या आरोग्य आणि परिवहन सुविधा

'लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४'  महाराष्ट्र सज्ज झाला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्य्यातील मतदान झाले आहे.  मतदानाचे तीन टप्पे शिल्लक आहेत.  पहिल्या दोन टप्प्यात मतदान करतानाचे नागरिकांचे आणि निवडणूक आयोगाचे  अनुभव पाहता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. 

मुंबईत मतदानावेळी मतदान केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना उष्माघात व अन्य त्रास होऊ नयेयासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता मुंबईत सुरू करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हेसुद्धा मतदान केंद्रांशी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांवर आरोग्य सुविधा पुरविणे सोपे होणार आहे.

मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबईत ९ हजार ८६२मतदान केंद्रे आहेत. त्यात शहरात २ हजार ५०९ तर उपनगरात ७ हजार ३५३ मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हामध्ये रांगा लावाव्या लागणार आहेत. मे महिना हा उन्हाळ्याचा महिना असल्याने या कालावधीत अधिक तापमान असण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाकडून केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडून मुंबई पालिकेवर सोपविण्यात आली आहे. . त्यामुळे  मुंबई महानगरपालिकेने निवडणूक केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आपला दवाखाना, आरोग्य केंद्र आणि डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी येवला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. किरण देशमुख यांनी डॉक्टर असोसिएशनची बैठक घेतली.  या बैठकीला शहरातील डॉक्टर असोसिएशनचा चांगला प्रतिसाद लाभला. मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावलेल्या मतदारांसाठी सवलत देण्याची भूमिका येवला नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी  जाहीर केली. त्यानुसार  जे नागरिक २० मे २०२४ ला मतदान करतील त्यांना आरोग्य तपासणी फी व इंजेक्शन फी यात सवलत देण्याचे डॉक्टर असोसिएशन यांच्यातर्फे कळवण्यात आले. तसेच शहरात व तालुक्यात उष्माघातामुळे नागरिकांना त्रास होऊ नये  याकरिता मतदान केंद्रांवर डॉक्टर असोसिएशनची टीम उपलब्ध राहून सेवा पुरवण्याचा निर्णय यावेळी डॉक्टर असोसिएशन कमिटीतर्फे घेण्यात आला. 

निवडणुकीत मतदान केंद्रापर्यंत पोहोचताना दिव्यांग उमेदवारांच्या वाट्याला येणारा मनस्ताप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाने एक  महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.   दिव्यांग उमेदवारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बेस्ट उपक्रमाची एसी बससेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोग, समाज कल्याण विभाग आणि बेस्ट उपक्रमाकडून ही सुविधा उपलब्ध केली जाणार असून लवकरच याबाबत निर्णय होईल. या मतदारांना कोणतेही शुल्क भरावे  लागणार नाही.  सध्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांतीलच मतदारांसाठी या बेस्ट सेवेचा विचार होत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'व्होट फ्रॉम होम' ही घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली आहे. मात्र ज्या मतदारांना मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी बेस्टची एसी सेवा दिली जाणार आहे. मुंबई उपनगरांतील निवडणुकीच्या दिवशी ही सेवा  दिव्यांगासाठी देण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरीकांसाठीही मतदानाच्या दिवशी या  बस सेवा  उपलब्ध केल्या जाणार आहेत.  त्यासाठी कोणत्या भागांत किती ज्येष्ठ नागरीक आहे, याची सविस्तर माहिती बेस्ट उपक्रमाला दिली जाणार आहे. त्यानुसार त्या-त्या भागांत बेस्टची सुविधा सकाळी मतदान सुरू होण्यापासून उपलब्ध केली जाईल. 

निवडणूक काळात निवडणूक कर्मचाऱ्यांची तसेच पोलिसांची वाहतूक करण्यासाठीही निवडणूक आयोगाने बेस्ट बसगाड्या उपलब्ध करण्यास सांगितले आहे. त्यावरही सध्या चर्चा सुरू आहे. ५०० हून अधिक बस उपलब्ध करण्याचे नियोजन असून यामध्ये ५० बस पोलिस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी असणार आहेत. 

अशा विविध लोकोपयोगी उपक्रमांद्वारे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाच्या रुपाने लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाल्या आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Thursday, April 25, 2024

चंद्रपूर महापालिका आणि मतदार जागृती अभियान

१९ एप्रिल २०२४  रोजी सकाळी ७  ते सायंकाळी ६ या वेळेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात  'लोकसभा निवडणूक २०२४' साठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. या मतदानास नागरिकांचा समाधानकारक प्रतिसाद लाभला. याचे श्रेय चंद्रपूर महानगरपालिकेला जाते.  लोकसभा निवडणूक २०२४' साठी  मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनामार्फत विविध प्रयत्न केले गेले. चंद्रपूर महानगरपालिकेनेही केले. 

लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून "सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन" (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा आरंभ चंद्रपूर महापालिकेने मनपा शाळांपासून केला. स्वीप अंतर्गत चंद्रपूर मनपाने शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र लिहून घेत,  पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.  संकल्पपत्रातील  संदेशानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहुन निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले. 

मतदार संघांतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचा मतदान प्रक्रियेत शंभर टक्के सहभाग असावा, त्यांना मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी, सक्षम लोकशाहीसाठी सर्वांनी मतदानाचा हक्क निर्भीड आणि निरपेक्षपणे बजावावा यासाठी मतदारांमध्ये जाणीव, जागृती निर्माण व्हावी म्हणून स्वीप अंतर्गत सर्व विद्यार्थी व पालक यांच्याकडून संकल्प पत्र भरून घेण्यात आले.  यामध्ये तयार केलेल्या संकल्प पत्राची प्रत शालेय विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांना देण्यात आली. चंद्रपूर मनपा शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला गेला. 

 मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी  नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचून ‘मतदार चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 'मतदार चिठ्ठी'द्वारे आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करता येते. तसेच मतदान केंद्र कुठे आहे याचीही माहिती मिळते.  चंद्रपूर महापालिकेनेही ‘मतदार चिठ्ठी’ चे  वाटप केले. या वाटपादरम्यान ज्या नागरिकांना मतदार चिट्ठी मिळाली नसेल त्यांना आपल्या बूथ लेव्हल ऑफिसरशी (बीएलओ) संपर्क करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच  व्होटर हेल्पलाईन ॲपवर जाऊन व्होटर सर्विसेसमध्ये, नो युवर पोलिंग स्टेशन डिटेल्समध्ये जाऊन आपला व्होटींग कार्ड नंबर (Epic Number ) टाकून कशी माहिती करून घेता येईल त्याविषयी जनजागृती केली.  त्याचप्रमाणे https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation  या लिंकवर जाऊन   'मतदार चिठ्ठी'ची कशी माहिती करती येईल याविषयी नागरिकांना मार्गदर्शन केले.  चंद्रपूर महानगरपालिकेने 'मतदार चिठ्ठी'च्या माहितीसाठी  18001237980 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला.  

मतदान हा आपला हक्क असला तरी अनेकदा त्याबाबत उदासीनता असते. त्यामुळे मतदारांमध्ये  याबाबत जागरूक वाढवणे आवश्यक आहे . मतदान केंद्रावर जाण्यास कंटाळा, सुटीचा दिवस,अनास्था अश्या विविध कारणांनी मतदानाचा टक्का खालावतो. मतदान वाढावे यासाठी शासकीय यंत्रणा तर प्रयत्नरत आहेच,मात्र त्याला संस्था,आस्थापना,व्यावसायिक यांची साथ मिळाल्यास निश्चितच मतदान जनजागृती होणार आहे.  या संदर्भात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि नागरिकांना त्यांचे मताधिकार वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी शहरातील आस्थापनांनी पुढे येत प्रेरीत उपक्रम राबविण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. विपीन पालीवाल यांनी केले. .या संदर्भात शहरातील विविध आस्थापनांची बैठक १२ एप्रिल २०२४ ला चंद्रपूर महानगरपालिका  सभागृहात आयोजीत करण्यात आली होती.  

चंद्रपूर शहरातील उपहारगृह,मॉल,चित्रपटगृह, दुकानं इत्यादी  आस्थापनांनी, मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी काही योजना राबविल्यास नागरिक मतदान करण्यास प्रोत्साहीत होऊन शहराची मतदान टक्केवारी वाढणं शक्य आहे.  शहरी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदानाला प्रोत्साहीत करणारे अशाप्रकारचे उपक्रम घेत  शहरातील आस्थापनांनी सहयोग करण्याचे आवाहन मा. आयुक्तांद्वारे बैठकीत करण्यात आले.

१९ एप्रिल रोजी जे नागरीक मतदान करतील, ज्यांच्या बोटाला शाई असेल त्यांना १९  व  २०  एप्रिल रोजी आझाद बगीच्यात मोफत प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा चंद्रपूर महानगरपालिकेने केली. 

चंद्रपूर महानगरपालिकेने  'स्वीप' अंतर्गत केलेल्या मतदार जागृती अभियानाचा फरक सकारात्मक झाला. नागरिकांचे मतदान करण्याच्या प्रमाणात वाढ झाली.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

लोककला, लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या पात्रांच्या माध्यमातून मतदान जागृती

'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४' साठी महाराष्ट्रातील  विविध स्थानिक स्वराज्य संस्थानी मतदान जागृती अभियान हाती घेतले आहे. या अभियानासाठी लोककलांचा आधार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख नगरपंचायतीने मतदान जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. कोकणची लोककला असलेल्या 'नमन' या लोककलेच्या माध्यमातून मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून, त्याचे भान नागरिकांना रहावे, मतदानाच्या दिवशी सर्व नागरिकांनी मतदान करावे व आपला हक्क आणि कर्तव्य बजावावे, असा संदेश नमन लोककलेमधील गौळण व वग या माध्यमातून देण्यात आला.

नमन या लोककलेच्या माध्यमातून देवरुख नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा कर व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी मतदानाची जनजागृती सुरू केली आहे. या नमनमधील गौळण प्रकारात नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी मावशी, गौळण आणि पेंद्या या भूमिका  साकारल्या. तसेच 'वग' प्रकारात राजा, काळू-बाळू भूमिकाही देवरुख नागरपंचायातीच्या कर्मचाऱ्यांनी साकारल्या. कर्मचाऱ्यांनी साकारलेल्या भूमिकांना  प्रेक्षकांची वाहवा मिळाली. या नमनात  ढोलकी, कीबोर्ड साथही नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

मातृ मंदिर चौक व देवरुख बसस्थानक येथे जनजागृती करण्यात आली. ७ मे २०२४ रोजी सर्व नागरिकांनी आपले अमूल्य मत देऊन मतदान करावे, असे आवाहनही 'नमन'च्या माध्यमातून देण्यात आले. 

लोकशाही टिकवा, मतदान करा' असा संदेश देत  वासुदेव वसई-विरार शहरातील रस्त्यावर आणि नाक्यांवर फिरत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी अधिकाअधिक नागरिकांनी मतदान करावे, यासाठी वसई-विरार महापालिकेने लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या 'वासुदेव' या  प्रमुख पात्राच्या रुपात जनजागृती सुरू केली आहे.

वासुदेव आणि महाराष्ट्राचे एक वेगळे नाते आहे. डोक्यावर मोरपिसांची टोपी हातात टाळ आणि तोंडात संतांचे अभंग असे लोभसवाणे रूप घेऊन वासुदेव नेहमी शहरांत गावात सकाळी फिरत असतो वंशपरंपरागत हा भिक्षुकीच्या व्यवसाय करणाऱ्या वासुदेवाचे दर्शन आजही अधूनमधून होत असते. अशाच वासुदेवाचे दर्शन सध्या वसई-विरार परिसरात सध्या सर्वांना होताना दिसत आहे. पूर्वीच्या काळात वासुदेव घरधनीच्या पित्तरांचे गोडवे गात प्रभुनामाची लोकगीते गात असे. वसईत दिसणारा हा वासुदेव मात्र लोकशाहीचा जागर करतोय. लोकशाही टिकविण्यासाठी मतदान करा, असे आवाहन हा वासुदेव लोकांना करत आहे.

वसई-विरार महापालिकेतर्फे मतदार जनजागृती आणि सहभाग कार्यक्रम (एसव्हीपी) सुरू करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वासुदेवाच्या रुपात नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. 'पायवाट; प्रॉडक्शनतर्फे हा वासुदेवाच्या पात्राची निर्मिती करण्यात आली आहे. हा वासुदेव ठिकठिकाणी फिरून लोकांना मतदानाचे महत्व पटवून देत आहे. आपले एक मत महत्वाचे आहे. एक मत देशाचे भवितव्य ठरविणा आहे. ते मत वाया घालवू नका, २० मे २०२४  रोजी मतदान करण्यासाठी केंद्रावर नक्की या, असे आवाहन हा वासुदेव लोकांना करत आहे. शहरातील चौक गर्दीची ठिकाणे या ठिकाणी हा वासुदेव लोकगीतातून लोकांना मतदानाने आवाहन करत आहे.

महाराष्ट्र संस्कृती आणि पंरपरेत वासुदेवाचे स्थान आहे. त्याची वेशभूषा आणि मधाळ वाणी आजही लोकांना आकर्षित करते. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या वासुदेवाचा आधार घेण्यात आला आहे. त्याला बघण्यासाठी ऐकण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.वासुदेवाच्या या आवाहनामुळे नागरीक मतदानासाठी मोठ्या  उत्साहाने बाहेर पडतील आणि आपले कर्तव्य पार पाडतील या उद्देशापोटी  मतदार जागृती अभियासाठी वासुदेवाची निवड केली आहे.

एकंदरीत लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी लोककला, लोकसंस्कृतीचा माध्यम म्हणून केलेल्या वापरास नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.  कदाचित मतदानाचा टक्का वाढविण्याची ही सुरुवात असावी.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...