भाईंदर पश्चिमेला मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी परिसर आहे. यात गणेश देवल नगर, जय अंबे नगर, बहादूर नगर व उत्तनमधील काही भागांचा समावेश आहे. यातील काही भागांत रहिवासी सार्वजनिक ठिकाणी वाटेल तिथे कचरा टाकतात. परिणामी रस्ते व नाल्यांना कचराकुंडीचे स्वरूप होते आणि पालिकेच्या स्वच्छता मोहिमेला धाब्यावर बसवले जाते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. पालिकेकडून वेळोवेळी स्वच्छता केल्यानंतरही हे चित्र कायम असते. या पार्श्वभूमीवर मिरा -भाईंदर पालिकेने 'ऑपरेशन रुद्र' या नावाने विशेष अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्वच्छता अभियानांतर्गत विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात भाईंदरमधील झोपडपट्टी परिसराचे रूप पालटणार आहे.
'ॲापरेशन रूद्र'चे स्वरूपRUDRA (Rapid Urban Drive For Rejuvenation Of Slum Area) म्हणजे झोपडपट्टी क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी बदलत्या तसेच स्वच्छ शहरांना साजेशी अशी जलदरित्या केली जाणारी कार्यवाही. 'ऑपरेशन रुद्र' हे अभियान दोन टप्प्यांत राबविले जाणार आहे. या अभियानाच्या लोगोचे अनावरण गणेश देवल नगर झोपडपट्टीत झाले. देवल नगर झोपडपट्टी व जय अंबे नगर परिसरात 'ऑपरेशन रुद्र'चा पहिला टप्पा राबविला जात आहे. या अभियानांतर्गत देवल नगर झोपडपट्टी व जय अंबे नगर परिसरातील प्रत्येक गल्लीत ओला व सुका कचरा टाकण्यासाठी डबे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. नागरिकांनी कचरा कुठे टाकावा व कुठे टाकू नये, कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे, याविषयी जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी पथनाट्याचा आधार घेतला जाणार आहे. अभियानांतर्गत परिसरात प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांवर तीव्र कारवाई केली जाणार आहे. अभियानासाठी तयार केलेल्या नियमांचे नीट पालन केले जात आहे की नाही याकरीता साहाय्यक स्वच्छता निरीक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. दोन ते तीन चाळींसाठी एक याप्रमाणे साहाय्यक स्वच्छता निरीक्षक ॲापरेशन रूद्र अंतर्गत काम करणार आहे. जे नागरिक आठवडाभरानंतरही घालून दिलेल्या स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणार नाहीत, ते 'ॲापरेशन रूद्र' च्या दंडात्मक कारवाईसाठी पात्र ठरणार आहेत. ही कारवाई कायदेशीरही असणार आहे.
आजही शहरातील अनेक झोपडपट्टी भागांत राहणारे लोक दररोज आपला कचरा कचरागाडीत न टाकता लगतच्या नाले व खाडीपात्रात राजरोस टाकत असतात. त्यात प्लास्टिक पिशव्यांचा मोठा समावेश असतो. त्यामुळे नाले, खाड्या कचऱ्याने तुंबलेल्या असतात. पालिका पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करते तेव्हा कचरा काढला जातो. लागलीच दुसऱ्या दिवशी पुन्हा लोक कचरा टाकून पाण्याचा निचरा बंद करतात. त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. झोपडपट्टी परिसरात स्वच्छता न राखणाऱ्यांवर तसेच प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा 'ऑपरेशन रुद्र' अंतर्गत उगारला जाणार आहे. त्यामुळे ऑपरेशन रुद्र' हा उपक्रम केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा भाग बनवणार आहे.
झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेतर्फे राबविले जाणारे 'ऑपरेशन रुद्र' हे एक प्रकारचे रोल मॉडेल आहे. या रोल मॉडेलचा उपयोग नजीकच्या भविष्यात मुंबई आणि उपनगरांतील झोपड्यांच्या स्वच्छतेसाठी केला जाणार आहे.
ऑपरेशन रुद्रची वैशिष्ट्ये
१. प्रत्येक गल्लीत ओला व सुका कचरा टाकण्यासाठी डबा दिला जाईल. पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांनी कचरा कुठे टाकावा व कुठे टाकू नये, वर्गीकरण कसे करावे याची जनजागृती केली जाईल.
२. बंदी असताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
३. सहायक स्वच्छता निरीक्षकाची नियुक्ती केली असून नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास आठवडाभरानंतर दंडात्मक कारवाई केली जाईल.
Facebook: https://www.facebook.com/MAHAUDD
Twitter: https://twitter.com/MAHA_UDD
Instagram: https://www.instagram.com/maha_udd/
Blog: https://mahaudd.blogspot.com/
YouTube: https://www.youtube.com/channel/UCe9-Tq8QTPQ4h8IyXp2wbvw
LinkedIn: https://tinyurl.com/2bpdv9sv
Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x
No comments:
Post a Comment