Tuesday, February 28, 2023

नवी मुंबई महानगर पालिका एक दृष्टिक्षेप (भाग-२)

नव्या मुंबईची रचना ही सिडकोने केलेली आहे.  राज्यातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर असलेल्या नवी मुंबईची देशात पहिला क्रमांक मिळविण्याकडे दमदार वाटचाल सुरू आहे. या महानगरपालिकेवर राज्य व केंद्र सरकारच्या पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवी मुंबईची स्मार्ट सिटी व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

नवी मुंबई मनपाने शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलेले आहे. नागरिकांना सर्वोत्तम नागरी सुविधा देण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. घणसोली-ऐरोली, वाशी, नेरुळ, तुर्भे येथे उड्डाणपूल उभारला आहे.  प्रत्येक विभागनिहाय मैदानांचा विकास करण्यात येत आहे. शहराच्या उत्पन्न वाढीवर काटेकोर लक्ष ठेवले जात आहे. रुग्णालय व्यवस्था बळकट केली जाणार आहे. पर्यावरण, शिक्षण, परिवहन सुविधेसह पायाभूत सुविधांची कामे सर्वोत्तम होतील, यावर लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य दिले जात आहे. नागरी आरोग्य केंद्र, माता बाल रुग्णालय, जनरल रुग्णालय या त्रिस्तरीय आरोग्य  व्यवस्थेला शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र हा चौथा स्तर जोडण्यात येणार आहे. स्वतःचे पदव्युत्तर पदवी महाविद्यालय सुरू केले जाणार असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मनपा रुग्णालयात आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

घनकचरा व्यवस्थापनाचा  नवी मुंबई मनपाने स्वतः चा असा एक  पॅटर्न तयार केला आहे. कोपरखैरणेमधील डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून तेथे निसर्ग उद्यानाची निर्मिती केली आहे. तुर्भे येथील डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यातून खतनिर्मिती केली जात आहे. याशिवाय आरडीएफची निर्मितीही केली जात आहे. घनकचरा वाहतुकीसाठीही आधुनिक साधनांचा उपयोग केला जात आहे. 

नवी मुंबईमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी महानगरपालिकेने प्रत्येक विभागातील मैदानांची सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. घणसोलीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल उभारण्यात येणार आहे. खेळाडूंसाठीही विविध योजना तयार करण्यात आल्या आहेत. सीवूड दारावे येथे मनपाने तयार केलेल्या फुटबॉल मैदानाचे जागतिक स्तरावरील खेळाडूंनीही कौतुक केले आहे.

महानगरपालिका मोरबे धरण परिसरात १०० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. याशिवाय शहरातील शाळा, प्रसाधनगृह येथेही नजिकच्या भविष्यात सौरदिवे लावण्यात येणार आहेत. शहर सुरक्षेसाठी शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, १५०० सीसीटीव्हीचे जाळे तयार केले जाणार आहे.

ग्रंथालय आणि वाचन चळवळीला चालना देण्यासाठी नवी मुंबईने प्रयत्न सुरू केले आहेत. महानगरपालिकेने विभाग तेथे ग्रंथालय मोहीम राबविली होती. आता झोपडपट्टी तेथे ग्रंथालय उपक्रम राबविला जात आहे. सानपाडामध्ये भव्य सेंट्रल लायब्ररी उभारली जात आहे. देशातील प्रमुख लायब्ररींमध्ये या सेंट्रल लायब्ररीचा समावेश होणार आहे.  वाचनाबरोबरीने नागरिकांना चांगले ऐकण्याची सवय लागावी, नागरिकांचा कान तयार व्हावा याकरीता ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे ज्येष्ठ विचारवंतांच्या व्याख्यानांचे आयोजन केले जात आहे. डॉ. अनिल काकोडकरांपासून अनेक मान्यवरांचे विचार या माध्यमातून शहरवासीयांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. 

स्वच्छता अभियानामध्ये महापालिकेने सर्वेक्षण देशपातळीवर ठसा उमटविला आहे. शहरांच्या भिंतींवर आकर्षक चित्र व संदेश रेखाटले आहेत. प्रसिद्ध

कवितांच्या ओळीही रेखाटण्यात आल्या आहेत. नवी मुंबईला भेट देणारे शहर सुशोभीकरण पाहून प्रभावित होतात. सुशोभीकरणाबरोबर स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले असून, देशात पहिल्या क्रमांकाचा निर्धार करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत नवी मुंबई मनपाने काही नाविन्यपूर्ण उपक्रम  केले आहेत.    इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत 'युथ वर्सेस गार्बेज' संकल्पनेमध्ये आयोजित कार्यक्रमात ५३ हजार युवकांचा सहभाग होता. पामबीच रोडवर मोराज सर्कल ते महानगरपालिका मुख्यालयापर्यंत ७५०० मीटर लांबीचा तिरंगा झळकविला. यामध्ये ८ हजार नागरिकांचा सहभागी झाले होते. 

वाशीच्या सेक्टर १० मध्ये स्वच्छता अभियानात २०७ तृतीयपंथीयांचा सहभाग होता. या विक्रमाची देशपातळीवर दखल घेतली गेली. 

दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडाली, उत्तरशिव आणि गोटेघर या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार याबाबतची अधिसूचना प्राथमिक अधिसूचना जाहीर झाली आहे.

तर अशाप्रकारे नवी मुंबई मनपा विविध प्रयोग राबवून शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे करीत आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...