Monday, July 11, 2022

शहरातील कचरा व्यवस्थापनाचे आदर्श

मुंबई महानगरपालिकेचे 'व्हिजन २०३०' असो किंवा एरंडोलसारख्या नगरपरिषदेने ओला आणि सुका कचरा वेगळा करून राबवलेला घनकचरा प्रकल्प असो किंवा कचरामुक्त शहराचा 'किताब मिळवणाऱ्या विटा नगरपरिषदेत राबवलेले अनोखे उपक्रम असो  हे सगळे प्रयत्न राज्यात सुरु आहेत ते शहरातील कचऱ्याच्या उत्तम व्यवस्थापनासाठी, पर्यावरणपूरक शहरी विकासासाठी. दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहरातील लोकसंख्येचा विचार करता मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसह शहरातील कचरा व्यवस्थापन हा नागरिकांच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा मुद्दा. गेल्या काही वर्षात कचराभूमीवरील कचऱ्याची विल्हेवाट, शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, कचऱ्यापासून वीजनिर्मिती करून वाहनांच्या चार्जिंगसाठी उपयोग असे अनेक प्रकल्प यशस्वी होऊ लागले आहेत. 

राज्यातील महानगरपालिका आणि नगरपरिषद यांच्या माध्यमातून सुरु असलेले हे प्रकल्प भविष्यात शहरातील कचरा व्यवस्थापनाची शिस्त लावतानाच आपला अनोखा आदर्श निर्माण करत आहेत. 

मुंबईमध्ये एकेकाळी नऊ हजार मॅट्रिक टन कचरा पालिकेकडून गोळा केला जात होता. हा सर्व कचरा डंपिंग ग्राउंडवर ( Dumping ground ) टाकला जात होता. कचऱ्याचे हे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेने कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी त्याची व्हिलेवाट लावण्याचा निर्णय घेतला. ओल्या कचऱ्यापासून खत ( compost manure from waste )बनवले जाणार आहे. हे खत शेतकऱ्यांना मोफत वाटले जाणार आहे.

जागतिक दर्जाचे शहर असलेली मुंबई कचरा मुक्त करण्यासाठी पालिकेकडून ( Mumbai Municipal Corporation ) गेले काही वर्षे प्रयत्न सूरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोसायटीमधील कचरा तीन डब्यांमध्ये गोळा केला जाणार आहे. ओल्या कचऱ्यापासून खत ( compost manure from waste )बनवले जाणार आहे. हे खत शेतकऱ्यांना मोफत वाटले जाणार आहे. मुंबईमधील उद्यानातही याचा उपयोग केला जाणार आहे. कुर्ला ( Kurla ) येथे याबाबत पथदर्शी प्रकल्प ( Pilot Project ) राबवला जाणार असून हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर संपूर्ण मुंबईत हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

कचऱ्याची विल्हेवाट

मुंबई महानगरपालिकेने ( BMC ) २ ऑक्टोबर २०१७ पासून सोसायट्यांना कचर्‍याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि १०० किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणार्‍या इमारती-आस्थापनांना ओल्या कचर्‍याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कचरा व्यवस्थापनला प्रोत्साहन देण्यासाठी कचर्‍याचे वर्गीकरण, ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मिती, सुक्या कचर्‍याची विल्हेवाट, टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर किंवा पर्जन्य जल संधारण योजना राबविणार्‍या सोसायट्या-आस्थापनांना करात सूट देण्यात येत आहे. त्यामुळे कचर्‍याचे दिवसाचे प्रमाण सुमारे साडेपाच ते सहा हजार मेट्रिक टनांवर आले आहे.

कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी उपक्रम

कचऱ्याचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी सोसायट्यांना ओल्या कचर्‍यासाठी हिरवा, सुक्या कचर्‍यासाठी निळा आणि आरोग्यासाठी धोकादायक कचर्‍यासाठी काळ्या रंगाचे असे तीन डबे देणार आहे. कुर्ल्यापासून पालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात करण्यात येणार असून या ठिकाणी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण मुंबईत योजना राबवण्यात येईल. कचर्‍याचा प्रश्न सोडवण्यासाठी चाळी-झोपडपट्ट्यां तसेच सोसायट्यांमध्ये कंपोस्ट खत प्रकल्प उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. तर आता घरोघरी कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी उपक्रम राबवण्यात येत आहे. कुर्ल्यातील उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर संपूर्ण मुंबईत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

अशी राबवणार मोहीम 

चाळी-झोपडपट्ट्या तसेच सोसायटीमधील कचर्‍याचा प्रश्न सोडवण्यासाठी आता कंपोस्ट खत प्रकल्प उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. तर आता घरोघरी कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी उपक्रम राबवण्यात येत आहे. ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खत बनवण्यासाठी तीन थर असलेले कंपोस्टिंग डब्बे देण्यात येतील. एक डब्बा भरल्यानंतर दुसरा आणि त्यानंतर तिसरा डब्बा भरण्याची व्यवस्था असेल.  तीन महिन्यानंतर खत तयार झाल्यानंतर हे खत पालिका घेऊन जाईल किंवा सोसायट्यांना आपल्या परिसरातील झाडे-उद्यानासाठी वापरता येईल. हे खत मुंबईत भाजी घेऊन येणार्‍या भागातील शेतकर्‍यांना मोफत दिले जाईल. पालिकेच्या उद्यानांमध्येही खत वापरता येईल. या उपक्रमासाठी झोपडपट्ट्या-सोसायट्यांना सुमारे २४० लिटर क्षमतेचे डब्बे पुरवण्यात येतील. यासाठी पालिकेच्या माध्यमातून धोरण तयार होत आहे.

शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी व्हिजन २०३०

भविष्यात शहरातील वाढत्या कचऱ्याचे व्यवस्थापन उत्तम व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिका स्वच्छ भारत सर्वेक्षण यांच्या एकत्रित कृतीतून व्हिजन २०३० कार्यक्रम राबवण्यात येत आहे. कचऱ्याचे विलगीकरण, विकेंद्रीकरण आणि विल्हेवाट या घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करून या कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे.

मुंबईसारख्या शहरात हे प्रयत्न सुरु असताना जळगाव मधील एरंडोल नगरपरिषदेतर्फे सुद्धा कचरा व्यवस्थापनाचे यशस्वी प्रयोग सुरु आहेत. शहरातील कचरा ओला, सुका आणि घरगुती घातक कचरा अशा तीन प्रकारात विलगिकरण करण्यात येतो. या कचऱ्यावर नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्प केंद्रावर प्रक्रिया केली जाते. ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले जाते तर सुका कचरा भंगारात विकून त्यातून उत्पन्न मिळवण्यात येते. ओल्या कचऱ्यापासून तयार केलेल्या या नगरपरिषदेच्या खतास हरित महासिटी कंपोस्ट ब्रॅण्ड प्राप्त झाला आहे. 

विटा शहर कचरामुक्त 

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत संपूर्ण सांगली जिल्ह्यातील विटा शहरातून शंभर टक्के कचरा संकलन यामध्ये ओला सुका व घातक यापद्धतीने वर्गीकृत कचरा संकलन केला जातो. कचऱ्यापासून बायोचार कंपोस्टिंग खत ते वीज निर्मिती असा नाविन्यपूर्ण प्रयोग विटा शहरांमध्ये राबवण्यात  येतो. शंभर टक्के संकलन घंटागाडीच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन भूमी येथे शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. तलाव स्वच्छता करुन गटरावर जाळी बसवणे,शहरांमध्ये असलेल्या सर्व मोठ्या जुन्या स्टोरीज बिन काढून ट्‌वीन बीन लावण्यात आलेल्या आहेत.  नागरिकांनी घरीच सेंद्रिय खत तयार करावे,यासाठी प्रोत्साहन देऊन होम कंपोस्टिंग हा उपक्रम राबवला.सोलर टवीन हा देशातील पहिला प्रयोग प्रकल्प विटा नगरपरिषदेने राबवला. शंभर टक्के कचऱ्यावर प्रक्रिया या पद्धतीचे कामकाज विटा पालिकेने राबवले, विटा शहरातील रहिवासी भागांमध्ये एक वेळ तर व्यापारी भागांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी संपूर्ण साफसफाई नित्य सुरु असते. नागरिकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे यामुळे स्वच्छतेत विटा नगर परिषद चांगली कामगीरी करु शकले आहे. 

शासन आणि नागरिक यांच्या एकत्रित कृतीतून सुरु असलेले कचरा व्यवस्थापनासाठीचे प्रयत्न भविष्यात पर्यावरणपूरक विकासाचे अनोखे आदर्श निर्माण करतील हे निश्चित. 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...