अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२ च्या अर्थसंकल्पात शहरीकरणाच्या नेमक्या याच मुद्द्यावर भाष्य केले, त्या म्हणाल्या, “ स्वतंत्र भारताच्या शंभरीपर्यंत निम्म्याहून जास्त लोकसंख्या ही शहरी भागात वास्तव्यास असेल आणि याची पूर्वतयारी करण्यासाठी सुनियोजित शहरी विकास अत्यंत महत्वाचा आहे. यातून शहरांची आर्थिक क्षमता, उपजीविकेच्या संधी यांचे परीक्षण करण्यास मदत होईल. याशिवाय राज्यातील मुख्य शहरांच्या आर्थिक विकासाकडे अधिक लक्ष केंद्रित करून पूरक केंद्र उभारण्यासाठी नियोजन करायला हवे. उच्च दर्जाचे शहर विकास नियोजक, मार्गदर्शक आणि शासन यांच्या एकत्रित कृतीतून हा शहरी विकास साध्य होणार आहे.”
अर्थसंकल्पात शहर नियोजनाविषयी मांडलेल्या या अत्यंत महत्वाच्या निरीक्षणानुसार महाराष्ट्रातील शहरांच्या विकासाचा हा प्रवास यापूर्वीच सुरु झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
नगर विकास मंत्री मा. एकनाथ शिंदे, नगर विकास विभाग प्रधान सचिव (१) भूषण गगराणी, नगर विकास विभाग प्रधान सचिव (२) महेश पाठक, यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि समन्वयातून ही नवी शहरे आकाराला येत आहेत.
एकांगी विकास महत्वाचा नसून शहरातील गरीब आणि श्रीमंत या दोन्ही गटातील नागरिक आनंदी जीवन जगले पाहिजेत या दृष्टिकोनातून नियोजनबद्ध विकास सुरु आहे.
समूह विकास प्रकल्पाच्या माध्यमातून बेकायदा बांधकामातील रहिवासी नागरिकांचा पुनर्विकास करणे, धारावीसारख्या मुंबईतील सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत शंभरहून अधिक शौचकूप असलेले सुविधा केंद्र उभारणे तर एकीकडे प्रदूषणमुक्त प्रवासासाठी विद्युत वाहनं उत्पादन आणि विक्रीवर भर देणे, मेट्रो सारखे प्रवासासाठीचे सुखकर पर्याय विकसित करणे, आरोग्य व्यवस्था आणखी भक्कम करण्यासाठी शहरात शासनाची अतिरिक्त आरोग्य केंद्रांची आखणी आणि त्याचे नियोजन करणे, मुळा-मुठा नदी, मिठी नदीचे शुद्धीकरण करून पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासाठी उपाययोजना करणे, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पदपथ विस्तारीकरण, सायकल ट्रॅक निर्मिती करणे, शहरात आर्थिक दुर्बल नागरिकांना उत्तम दर्जाची शासनाची शिक्षण व्यवस्था देऊ करण्यासाठी महापालिका शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, टॅब अशा सुविधा देऊन खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा निर्मिती करणे अशी शहर विकासाची कितीतरी उदाहरणे देता येतील..
भविष्यात वाढणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करून शहरातील नागरिक, संस्था, विविध तज्ज्ञ, शहर अभ्यासक यांच्या एकत्रित सहभागाने विकसित शहरांची निर्मिती करणे, हेच आहे का उत्तम नियोजनाचे गमक ? तर नक्कीच होय.. भविष्यातील शहरं याच धर्तीवर उभी राहत आहेत. एकटे शासन शहर विकासाचे कर्ते नसून नागरिक, अभ्यासकांच्या एकत्रित कृतीतून आणि सहभागातून आपण भविष्यातील शहरांचा चेहरा बदलणार आहोत.
सध्या महाराष्ट्रात सुरु असलेले विविध प्रकल्प, नवनवीन बदल, प्रवासाचे पर्याय भविष्यात नव्या पिढीला शहरांतर्गत अत्याधुनिक सेवा-सुविधांची, उत्तम स्वास्थ्याची भेट देण्यासाठी आदर्श ठरतील, अशी नगर विकास विभागाला खात्री आहे.
एक नागरिक, निरीक्षक आणि पर्यटक अशा तिन्ही दृष्टीने आपण या शहरांचा विकास होताना टप्प्याटप्प्याने पाहिला असेल तर जुनी शहरं आणि नवी शहरं यातील सुधारणा आपल्याला लक्षात येतात आणि ‘ही शहरं मोठी कशी होतात’ याचे उत्तर आपसूकच मिळते.
Facebook: https://www.facebook.com/MAHAUDD
Twitter: https://twitter.com/MAHA_UDD
Instagram: https://www.instagram.com/maha_udd/
Blog: https://mahaudd.blogspot.com/
No comments:
Post a Comment